“ती तुमची लाडकी बहीण नाही का?” मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याने राज ठाकरे संतापले | Raj Thackeray

Raj Thackeray Angry for Marathi Family

Raj Thackeray: कल्याणमधील सोसायटीत धूप लावण्याच्या वादातून तुफान राडा झाला आणि यात अखिलेश मिश्रा या परंप्रातीय व्यक्तीने 10 ते 15 जणांच्या टोळक्याला बोलावून मराठी असलेल्या देशमुख कुटुंबाला मराठी असण्यावरून अर्वाच्य शिव्या देत, बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री कल्याणच्या योगीधाम परिसरात मराठी माणसांचा संताप पाहायला मिळाला.

परंप्रातीय अखिलेश शुक्ला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मध्ये अकाऊंटंट मॅनेजर आहे, मात्र, तो आपण IAS अधिकारी असल्याचे सांगून सोसायटीमधील रहिवाशांना धमकावायचा. तसेच तो खासगी गाडीवर IAS अंबर दिवा लावून फिरायचा. त्या गाडीचा इन्शुरन्सही 10 मार्च 2020 रोजी संपल्याची माहिती समोर आली आहे. अशा या शुक्लाचे अनेक कारनामे समोर येत आहे. तसेच अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वीही अनेकदा मराठी माणसांविषयी अपमानजक शेरेबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुम्ही मराठी माणसे घाण आहात तुमचा वास येतो. तुम्ही मांसमच्छी खाणारे आहात. तुमच्या सारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहेत, अशी शेरेबाजी शुक्ला कुटुंबीयांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे म्हणाले की “सस्नेह जय महाराष्ट्र,

कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला , गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही !

कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं ? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला ! मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे.

आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेंव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो !

अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच ! ‘लाडकी बहीण’च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का ? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार ! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात ? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ….

हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदू म्हणून एकत्र येताना, प्रत्येक राज्यात तिथली भाषा, तिथली स्थानिक माणसं , तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये. हिंदूत्व आम्ही देखील पुजतो परंतू हिंदूना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लगणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे !

मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका.

मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी.

राज ठाकरे ।” अशा प्रकारे राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top