Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) अखेर आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले आहे. आंतरवाली सराटीमधून (Antarwali Sarathi) मधून निघालेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत हजारोंचा जनसमुदाय पाहायला मिळत आहे. केवळ एका माणसाच्या हाकेवर हजारोंचा जनसमुदाय मुंबईच्या दिशेने निघणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठयांच हे वादळ आता मुंबईत धडकणार आहे. (manoj jarange patil moved mumbai for maratha reservation)
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. या पायी दिंडीची सुरुवात आज आंतरवाली सराटी येथून झाली आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या जन्मगावी शिरूर कासार तालुक्यातील मातोरी येथे पायी दिंडीचा पहिला मुक्काम होणार आहे. 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी घेतला आहे. आंतरवाली सराटी येथून निघण्याआधी मनोज जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांचे डोळे पाणावले आणि ते भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की “सामंजस्याची भूमिका होती, म्हणून सरकारला ७ महिन्यांचा वेळ दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा सन्मान केला आहे. कुणबीच्या 54 लाख नोंदी मिळाल्या असूनही प्रमाणपत्र मिळत नाही. जाणूनबुजून मराठ्यांच्या लोकांचा वाटोळं करण्याचं सरकारचं स्वप्न दिसत आहे. नोंदी मिळालेल्या असतानाही आरक्षण देऊ शकत नाही? हे दृष्य भयानक आहे. याच्यापेक्षा निर्दयीपणा काय असेल. तरी, आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. मुंबईला जाण्याची घोषणा केल्यानंतरही सरकार गांभीर्यानं घेत नाही. हा खूप अन्यायाचा कळस झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर मुंबईकडे जाण्याची वेळ आली नसती. मुंबईत काहीही झालं तरी हरकत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही.” असं मुंबईकडे निघण्यापूर्वी मनोज जरांगे म्हणाले आहे.
राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करण्याच्या उद्देशाने मनोज जरांगे पाटील हे हजारो मराठा आंदोलकांसोबत मुंबईकडे रवाना झालेय. तसेच आता त्यांच्या सोबत राज्यभरातील मराठा समाज हा विविध ठिकाणी मोर्चे आणि आंदोलने करण्याची शक्यता आहे. या कारणामुळेच राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक काढण्यात आले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक बंदोबस्तासाठी 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सर्व पोलीस अधिकारी, अमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या (मेडिकल रजा वगळून) रद्द करण्यास घटक प्रमुखांना मान्यता देण्यात आली आहे.

गावांत मराठा आंदोलकांसाठी जेवण्याची सोय
“एकही मराठा बांधव उपाशी राहू नये म्हणून ही पायी दिंडी ज्या गावातून जाणार आहे. तेथील गावकऱ्यांनी पायी दिंडी सहभागी व्हावे आणि मराठा बांधवांच्या जेवणाची सोय करावी.” असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे आता ज्या गावातून मराठा आंदोलक जाणार आहे, त्यापैकी काही गावांत मराठा आंदोलकांसाठी राहण्याची आणि जेवण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी अनेक गावांत गावकऱ्यांकडून अगदी जय्यत तयारी करण्यात येत आहे.