Nitin Gadkari Angry on Casteism: सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून OBC विरुद्ध मराठा हा जातीय संघर्ष बघायला मिळतोय. संपूर्ण महाराष्ट्र सध्या जातीय राजकारणात विभागला गेल्याचा दिसतोय. मी मराठी किंवा मी भारतीय या ऐवजी महाराष्ट्रात सध्या मी या जातीचा आणि मी त्या जातीचा असं म्हणताना अनेकजण दिसत आहे. जो तो आप-आपल्या जातीय आरक्षणासाठी सध्या लढतांना दिसतोय. यावरच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीवादावर कठोर शब्दांत भाष्य करत “जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ पडणार” असं म्हटलं आहे.
गांधीवादी विचारक रघू ठाकूर यांच्या ‘गांधी- आंबेडकर कितने दूर कितने पास’ या पुस्तकाचे लोकार्पण प्रेस क्लबच्या सभागृहात शनिवारी झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच्या सोबतच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ब्रम्हानंद स्वाई, सुरेशबाबू अग्रवाल, एस. एन. विनोद, नचिकेता शर्मा, मंदाकिनी भिल उपस्थित हेही होते.
राष्ट्रपुरुषांना समाजाचे लेबल लावणे अयोग्य
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रात सध्या चाललेल्या जातीयवादावर “जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ पडणार” असं म्हणत ते पुढे म्हणाले आहे की “महाराष्ट्रात विविध जातींची आंदोलने होत आहेत. त्यापैकी बरेच शिष्टमंडळ मला येऊन भेटतात. मी कधीही जात-पात मानली नाही. त्यामुळे या चुकीच्या राजकारणातून समाज व देशाचा विकास शक्य नाही. राष्ट्रपुरुषांना समाजाचे लेबल लावणे अयोग्य, शिवाजी महाराजांना मराठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलित , महात्मा ज्योतिबा फुले यांना माळी, टिळकांना ब्राम्हण समाजाचे लेबल लावण्यात आले आहे. हा प्रकार योग्य नाही. राष्ट्रपुरुषांना आपण अशा विवादात टाकल्यास समाजातून मूलभूत गोष्टी नष्ट होतील.”
पुढे नितीन गडकरी म्हणाले की “आजच्या पिढीला भूतकाळातील संघर्षाची माहिती नाही. त्यामुळे आपण घरी एक विचार घेऊन चाललो असलो तरी ही पिढी वेगळाच विचार करताना दिसते. त्यामुळे सगळ्या विचारांमधील मूलभूत गोष्टी लुप्त होणार काय, हा प्रश्न आहे. महात्मा गांधी यांनी स्वदेशी, स्वावलंबत्व, स्वातंत्रासाठी खूप काम केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. त्यामुळे दोघांतील साम्यांचा विचार या पुस्तकात आहे.”
“सध्या आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे कोणीही आमचा झेंडा घेते. जसे लोक तसे पक्ष आहे.” असंही यावेळी नितीन गडकरी म्हणाले आहे.
महात्मा गांधी बाबत खोट्या गोष्टी बोलल्या जातात
‘गांधी- आंबेडकर कितने दूर कितने पास’ या पुस्तकाचे लेखक आणि गांधीवादी विचारक रघू ठाकूर यांनी या कार्यक्रमात म्हटले आहे की “महात्मा गांधी यांच्याबाबत हल्ली खोट्या गोष्टी बोलल्या जातात. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातही वाद होते असं म्हटलंजातं. परंतु प्रत्यक्षात दोघांची काही मुद्यांवर मतभिन्नता होती, तरी दोघेही एकमेकांचा खूप आदर करायचे.” असं रघू ठाकूर म्हणाले आहे.