Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. पण त्या सोबतच मनोज जरांगेंनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. (Manoj Jarange Patil Big Demand from Shambhuraj Desai)
मनोज जरांगे पाटील हे गेल्या 6 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले होते. काल सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांचे शिष्टमंडळ जरांगेंसोबत चर्चेसाठी पाठवले. सरकारच्या शिष्टमंडळात खासदार संदीपान भुमरे, राज्याच्या महायुती सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई अंतरवाली सराटी येथे आले होते. त्यांची जरांगे यांच्याशी चर्चा झाली असून शंभूराज देसाई यांनी 1 महिन्यात सगेसोयरे मागणीसह जरांगे यांनी सरकार कडे दिलेल्या मागण्यांवर निर्णय होणार असल्याचा शब्द दिल्यावर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण स्थगित केले आहे.
यावेळी मनोज जरांगें हे सरकारला अल्टिमेटम देत म्हणाले आहे की “आम्ही पाच महिने मुदत दिली, त्यात 2 महिने आचारसंहितेमध्ये गेलत. वाशीच्या आंदोलनापासून सरकारला 5 महिन्यांचा वेळ दिला, पण सरकारने कोणतीही पाऊले उचलेले नाहीत. आता सरकारला 13 जुलैपर्यंत 1 महिन्याची मुदत दिली आहे. शिवाय, 1 महिन्याच्या आत सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर विधानसभा निवडणूक लढवणार, आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तर आम्ही आता राजकारणात उतरणार आहोत, तसंच नावं घेऊन उमेदवार पाडणार प्रसंगी काही ठिकाणी उमेदवार देणार नाही पण नावं घेऊन उमेदवार पाडणार एवढं लक्षात घ्या.” असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.
यासोबतच मनोज जरांगेंनी 100 कोटीं बाबत एक खळबळजनक गौप्यस्फोट करत मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. यात मनोज जरांगे म्हणाले आहे की “मी पहिल्यापासून सांगतोय, पण आज जबाबदारीने सांगतो. या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून काम घेतले असतील? कोणी पैसे घेतले असतील? माझं नाव सांगून का हाईना. मला ती यादी द्या. माझ्या कानावर 100 कोटींचा आकडा आलाय. मी जबाबदारीने हे सांगत आहे. वेळ आल्यावर तो कोण माणूस आहे, त्याचे नाव देखील घेणार आहे. तो म्हणलाय तर त्याची चौकशी करायची असेल तर करा. त्यामध्ये मी जर असलो तर मलाही सुट्टी नाही, माझ्या शेजारचा असला तर त्यालाही सुट्टी नाही. मला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या आहेत.” असं मनोज जरांगे म्हणाले आहे.
म्हणजेच मराठा आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये उकळले असल्याचा संशय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. याच मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.