Indurikar Maharaj: धर्माच्या नावाखाली आमच्या गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका – इंदुरीकर महाराजांकडून राजकारण्यांची कानउघडणी

indurikar maharaj-Don't-sacrifice-our-poor-children-in-the-name-of-religion

Indurikar Maharaj: तुमचा धर्म माईकवर आहे आमचा आमच्या हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करु नका. धर्माच्या नावाखाली आमच्या गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी राजकारण्यांची कानउघडणी केली आहे.

आपल्या अनोख्या किर्तन शैलीसाठी इंदुरीकर महाराज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. तरुण वर्गामध्ये महाराजांची प्रचंड क्रेझ आहे. आपल्या किर्तनातून समाजातील ज्वलंत विषयावर भाष्य करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. महिला वर्गावर केलेल्या टिप्पणीमुळे काही महिन्यापूर्वी इंदुरीकर महाराज चर्चेत आले होते. त्यांच्या किर्तनांमधून ते अनेकदा जनजागृती व प्रबोधनाचं कार्य करत असतात. त्यांचे अकोल्यात नुकतेच झालेले किर्तन राज्यात चर्चेचा विषय बनले आहे. त्यात त्यांनी धर्मांचं भांडवल करु नका, गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका, असं म्हणत त्यांनी राजकारण्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

इंदुरीकर महाराज म्हणाले की, तरुणांनो एक गोष्ट सांगतो तुम्ही या दंगली बिंगलींच्या फंद्यात पडू नका. माझ्या इतकी किर्तनं महाराष्ट्रात अजून कुणी केली नाहीत. मी ८० किर्तनांच्या खाली महिना काढत नाही. माझी वाक्यं फक्त पुस्तकांतली नाहीत, तर अनुभवांमधून आलेली आहेत. आत्तापर्यंत लोकांकडे असलेल्या पेनांमध्ये कॅमेरे आहेत. जर दंगली बिंगलीत दिसले तर दहा वर्षे शिक्षा आहे. आतापर्यंत गरीबांचीच लेकरं आत गेली आहेत. मोठ्यांचे कधीही आत गेले नाहीत आणि जाणार नाहीत. हे मी तुम्हाला तळतळीने सांगतो आहे.

इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की, तुम्हाला कोणी विचारले की, तुम्हाला धर्माचा अभिमान नाही का? त्याला सांगा तुमचा धर्म माईकवर आहे आमचा आमच्या हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करु नका. धर्माच्या नावाखाली आमच्या गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका. सगळे पोलीस तुम्हाला सांगतील आज एकही काम पोलीस व्हेरीफिकेशन शिवाय होत नाही. हे लक्षात ठेवा. त्यामुळे दंगलीत पडू नका.

चारित्र्याचा दाखला देण्याचं काम पोलीस करत असतात. जर पोलिसांचा दाखला चुकीचा मिळाला तर गेम झालाच म्हणून समजा. आम्ही काहीही केलं नाही,बँक लुटली नाही, गुन्हा काही केला नाही तरीही रोज नवं लफडं आहे माझ्याभोवती. गुन्हा एकच आहे ते म्हणजे मी खरं बोलतो. तुम्ही दंगली बिंगलीत पडू नका. तुम्ही गरीब राहा, घरी घरी कुल्फी विका, अजून काही विका पण या असल्या गोष्टींमध्ये पडू नका.

४० टक्के तरुण पोरं पुढाऱ्यांच्या मागे फिरून काहीही कामधंदा न करता भिकारी झाली आहेत. आज पैसा कमावणं सुद्धा पाप झालं. आपण कापूस ५०० क्विंटल विकला दोन कोटी आले तर लगेच दोन कोटी कुठून आले? याची चौकशी होते. ज्यांनी आयुष्यभर पोरांचा वापर भोंगे बांधायला केला ते नोकरी देऊ म्हणतात. राजकारण्यांनी युज अँड थ्रो सारखं पोरांना वापरलं आहे. मी मेल्यावर तुम्हाला मी काय म्हणतो आहे त्याची आठवण येईल. पण फरक काही पडणार नाही, असा टोलाही इंदुरीकर महाराजांनी लगावला आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top