Maldives vs India: मालदीव विरुद्ध भारत – भारतीय कलाकार आणि खेळाडू संतापले – काय आहे प्रकरण?

Maldives vs India

Maldives vs India: मालदीवच्या सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी आणि मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने भारतात अनेक सेलेब्रिटी आता मालदीव विरोधी भूमिका घेत पुढे आले आहे. भारतातून प्रचंड विरोध झाल्यानेच आता मालदीव सरकारने सुद्धा आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या त्यांच्या काही मंत्र्यांना सस्पेंड केले आहे. त्यामुळे बघूया नेमकं काय आहे हे प्रकरण. (Indian Actor and Cricketers supoort Lakshadweep against Maldives)

मोदींच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यावर केली होती टीका

काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे लक्षद्वीपच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा तेथील बीचवरील काही फोटो त्यांनी सोशल मिडियावर शेअर केले होते. त्यांनतर मालदीवमधील सत्ताधारी पक्षाच्या काही मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान मोदींवर निशाना साधत काही वादग्रस्त वक्तव्य केली. यामुळेच आता भारतात मालदीव विरोधात वातावरण तापले आहे. भारतातील अनेक कलाकार, क्रिकेटपटू तसेच वेगवेगळे सेलेब्रिटी यांनी मालदीव विरोधी भूमिका घेत भारतातील लक्षद्वीपला पर्यटन क्षेत्र बनवण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपच्या दौऱ्यानंतर शेअर केलेल्या फोटोवर टीका करत मालदीवमधल्या सत्ताधारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ यांनी वादग्रस्त वक्तव्य करत भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्यांना ‘विदूषक’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असं म्हटलं होतं. यानंतर मालशा शरीफ आणि महजून माजिद या दोन मंत्र्यांनी सुद्धा नरेंद्र मोदींवर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केली होती.

भारत सरकारने व्यक्त केली नाराजी

मालदीवच्या सरकारमधील या मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारत सरकारने मालदीव सरकारकडे आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. मालदीवमध्ये असलेल्या भारताच्या उच्चायुक्तांनी सुद्धा मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मालदीव सरकारने आता अधिकृत निवेदन जारी केलं आहे. यात मालदीव सरकारने म्हटलं आहे की आमच्या मंत्र्यांनी केलेली व्यक्तव्ये ही त्यांची वैयक्तिक आहेत, मालदीव सरकारचा त्याच्याशी संबंध नाही. असं म्हणत मालदीव सरकारने हात वर केले असले तरी भारतात हा वाद काही केल्या थांबत नाहीये. भारतात मालदीवच्या सरकारमधील या मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा प्रचंड विरोध होत आहे.

भारतीय कलाकार, क्रिकेटपटू मालदीव विरोधात

मालदीवच्या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भारतीय कलाकारांनी आणि क्रिकेटपटू यांनी तीव्र विरोध केला आहे. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), सलमान खान (Salman Khan), रणवीर सिंग, वरून धवन, जॉन अब्राहम, अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिकेटपटू सचिन तेंदुलकर (Sachin Tendulkar), हार्दिक पंड्या आणि इतर काही माजी खेळाडू ई. या काही सेलेब्रिटींनी पुढे येत मालदीव विरोधी भूमिका घेत भारतातील लक्षद्वीप बेटे (Lakshadweep) आणि इतर पर्यटनस्थळे विकसित करण्याची मागणी केली आहे.

अक्षय कुमारचा मालदीव विरोधी संताप

मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार खूपच संतापल्याचा दिसला. अक्षय कुमार ट्वीट करत म्हणाला की “मालदीवमधील प्रमुख व्यक्तींकडून भारतीयांविरोधात द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. ज्या देशाने त्यांना सर्वाधिक पर्यटक पाठवले त्या देशासाठी ते हे करत आहेत हे आश्चर्यकारक आहे. आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगले आहोत पण असा अनावश्यक द्वेष का सहन करावा? मी अनेक वेळा मालदीवला भेट दिली आहे आणि नेहमीच त्याचे कौतुक केले आहे, परंतु सन्मान प्रथम येतो. चला भारतीय बेटांचा शोध घेऊ आणि आपल्या देशाच्या पर्यटनाला चालना देऊ या”. असं म्हणत अक्षय कुमारने भारतीय पर्यटनाला चालना देण्याची मागणी केली आहे.

या सोबतच इतर कलाकार आणि क्रिकेटपटू यांनी भारतातील लक्षद्वीप बेटे आणि इतर पर्यटनस्थळांचे फोटो शेअर करत भारतीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.

मोदींवरील वादग्रस्त वक्तव्ये भोवली

मालदीवच्या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भारतात तीव्र विरोध सुरु झाल्याने अखेरकार मालदीव सरकारने कारवाई करत मोदींविरोधी वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री मरियम शिउना, मालशा शरीफ आणि महजून माजिद यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पण यामुळे आता भारतात मालदीव विरोधी तयार झालेले वातावरण खरंच शांत होणार का? असाही प्रश्न आहे.

मालदीव सरकार भारत विरोधी

काही महिन्यांपूर्वी मालदीव मध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचे नवीन सरकार निवडून आले आहे. पण हे सरकार भारत विरोधी असून चीनचे समर्थन करणारे आहे. या नवीन सरकारने भारतासोबतच्या काही धोरणांमध्ये सुद्धा बदल केला. त्यांनी मालदीवमध्ये असलेले भारतीय लष्करी अधिकारी सुद्धा पुन्हा मायदेशी पाठवले. तसेच आता त्यांच्या मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारत आणि मालदीव मधील राजकीय संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहे.

तणावपूर्ण संबंधाचा भारताला फायदा

सध्या भारत आणि मालदीव मध्ये बनलेल्या तणावपूर्ण संबंधाचा भारताला खूप फायदा होऊ शकतो. कारण मालदीवला भारतातून खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात. यातून मालदीवला खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. त्यामुळे भारतातून बराचसा पैसा भारताबाहेर जातो. पण जर आता मालदीव विरोधी भूमिका घेऊन भारतीय बेटे आणि इतर पर्यटन स्थळांना चांगले विकसित केले तर मालदीवला जाणारे भारतीय पर्यटक भारतीय बेटांवर जातील. यामुळे तेथील स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. आणि भारतीय पर्यटनाला देखील चालना मिळेल. यामुळे फक्त भारतीयच नाही तर परदेशी पर्यटक सुद्धा भारतात येतील.

भारतीय पर्यटनाला चालना मिळाली तर भारतातील पैसा भारतातच राहील, शिवाय परदेशी पर्यटक आल्याने भारताला परदेशी चलन सुद्धा मिळेल. म्हणूनच भारतीय सेलिब्रेटींनी आणि क्रिकेट खेळाडूंनी मालदीव विरोधी घेतलेली भूमिका भारताच्या पर्यटनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top