36 Guni Jodi off air: सध्या झी मराठीचं नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय. कारण आता मालिकांच्या वेळ बदलायच्या की त्या बंद करायच्या यावरून झी मराठीचा पूर्ण गोंधळ उडाल्याचा दिसतोय. दुसरीकडे प्रेक्षकांनीही आता झी मराठीच्या गोंधळावर प्रचंड टीका केली आहे. खरंतर झी मराठी सारखा मोठा चैनेल एवढा गोंधळ घालू शकतो यावर विश्वास बसत नाहीये. कदाचित सध्या TRP रेस मध्ये स्टार प्रवाह चैनेलच्या तुलनेत प्रचंड मागे पडल्याने आता कोणती मालिका बंद करावी आणि कोणती सुरु ठेवावी यात झी वाल्यांचा असा गोंधळ झाला असावा.
झी मराठीचा हा गडबड-गोंधळ
झी मराठीचा हा गडबड-गोंधळ झालाय तो ’36 गुणी जोडी’ या मालिकेच्या बाबतीत. झी मराठीवर ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन कार्यक्रम सुरु झालाय. त्यामुळे काही मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आलाय. यानुसारच रात्री 11 वाजता दाखवण्यात येणारी 36 गुणी जोडी ही मालिका दुपारी 2:30 वाजता दाखवण्यात येणार असल्याचे झी मराठीने जाहीर केले आणि त्यानंतरच हा वाद सुरु झाला.
36 गुणी जोडी या मालिकेच्या दुपारच्या वेळेला प्रेक्षकांनी प्रचंड विरोध केला. सतत या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात येत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. या कारणामुळे झी मराठीने माघार घेत पुन्हा ही मालिका पूर्वीप्रमाणे रात्री 11 वाजता सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतर आता तर झी ने ही मालिकाच बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळतेय.
प्रेक्षकांसमोर माघार पण मालिकाच बंद
झी मराठीने 36 गुणी जोडी ही मालिका एवढ्या घाईने आणि गडबड-गोंधळ घालत बंद करण्याचा निर्णय का घेतला? या बद्दल सर्वांनाच प्रश्न पडलाय. आता प्रेक्षकही झी मराठीच्या या निर्णयावर खूप टीका करत आहे.
36 गुणी जोडी ही मालिका बंद होत असल्याची माहिती या मालिकेतील कलाकारांनीच दिली आहे. या मालिकेतील मुख्य भूमिकेत झळकणारा वेदांत म्हणजेच अभिनेता आयुष्य संजीव याने सोशल मीडियावर शेवटच्या शुटींगचे सेटवरील काही फोटो शेअर करून मालिका निरोप घेत असल्याची माहिती दिली आहे.
तर अशा प्रकारचा गडबड-गोंधळ घालत झी मराठीने आता 36 गुणी जोडी ही मालिका एकदमच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण प्रेक्षक मात्र झी च्या या निर्णयामुळे प्रचंड नाराज असल्याचे दिसत आहे.