Ravindra Mahajani: अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधन होऊन 6 महिने झाल्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रकाशित झालं. यात माधवी यांनी रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. पण अनेकजण त्यांना असा प्रश्न करत आहे की रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतरच का हे पुस्तक प्रकाशित केले? ते जिवंत होते तेव्हाच हे पुस्तक प्रकाशित करायला हवे होते.. असं अनेकांनी म्हटलंय. तर याचेही उत्तर माधवी यांच्या या पुस्तकात मिळत आहे. (Actor Ravindra Mahajani left home – Madhavi’s message to him, but..)
हे पुस्तक लिहित असतांना अभिनेते रवींद्र महाजनी जिवंत होते. पण ते पुन्हा घर सोडून निघून गेले होते म्हणून माधवी यांनी या पुस्तकाच्या शेवटी त्यांनी पुन्हा घरी यावे म्हणून पेज नंबर 109 ते 110 वर एक संदेश सुद्धा देण्याचा प्रयत्न केला होता. पण हे पुस्तक प्रकाशित होण्याआधीच रवींद्र महाजनी यांचे निधन झाले.
या पुस्तकाच्या शेवटी माधवी यांनी रवींद्र महाजनी यांना संदेश देण्याचा प्रयत्न करत म्हटलंय की “अलीकडे काही दिवसांपूर्वी रवी असाच काहीतरी निमित्त काढून घर सोडून गेला आहे. मागे तो असा बऱ्याच वेळा जायचा. काही काळानंतर परत यायचा. आल्यावर मागचं काहीही मी काढत नाही. काही विचारत नाही. आमचा नेहमीसारखा संसार पुढे चालू होतो. आता मात्र वाटते, की या वयात त्याने एकटे राहू नये. आमच्या सगळ्यांबरोबर आनंदाने राहावे. त्याने आम्हाला त्याचा काही पत्ताही कळवलेला नाही. त्यामुळे मनात एक रुखरुख राहिली आहे. कधीकधी फार एकटे वाटते.”
“खरं तर, आता सगळी संकटे संपून सुखाचे दिवस आले आहेत. गश्मीर त्याच्या करिअरमधे यशाची नवीनवी शिखरे गाठतो आहे. आतापर्यंत त्याचे चित्रपट, सीरिअल्स आणि तीन वेब सीरीज झाल्या. फिल्म फेअर ॲवॉर्ड, स्टेट अॅवार्ड अशी काही ॲवॉर्ड्स मिळालीत. अजूनही काही ना काही चालूच आहे. सून गौरी घरातले सगळे नीट बघते आहे. व्योम हा तर आमच्या घरातले चैतन्य आहे.”
“रवी नेहमीच मनमानी करीत राहिला आणि मनाला येईल तसे वागत राहिला. मी आयुष्यभर त्याच्यामागे फरपटत राहिले. कधीतरी वाटते की, आता ही फरपट पुरे. त्याची मनधरणी करून त्याला घरी परत आणणेही पुरे. त्याने त्याच्या मनाने भरल्या घरात यावे, आनंदाने राहावे. आम्ही सर्वजण त्याचं प्रेमानं स्वागत करू याची त्याला खात्री असणार कारण तो अनुभव त्यानं अनेकदा घेतला आहे.”
“आता माझंही वय झालं आहे. चौऱ्याहात्तर वय आहे माझं. अजून देवाने किती दिवस माझ्यासाठी शिल्लक ठेवले आहेत माहीत नाही. पण दैवाने माझ्या वाट्याला जे दिले, ते मी मनःपूर्वक स्वीकारले. त्याला बिनतक्रार तोंड दिले, मार्ग काढून पुढे चालत राहिले. प्रेम वाटत राहिले. प्रेम मिळतही राहिले. अजून काय हवे? व. पु. काळे या प्रसिद्ध लेखकाने एके ठिकाणी म्हटले आहे, ‘एक क्षण भाळण्याचा आणि बाकी सारे क्षण सांभाळण्याचे. ‘ मला वाटतं, मीही अशीच एका क्षणी भुलले… रवीवर भाळले आणि आयुष्यभर जे समोर आले ते सांभाळत राहिले.” असं माधवी यांनी या पुस्तकाच्या शेवटी म्हटलं आहे.
माधवी यांनी एक प्रकारे रवींद्र महाजनी यांना संदेशच लिहिला आहे की त्यांनी आता स्वतःच्या मनाने घरी परत यावे, सर्व परिवारासोबत एकत्र आनंदाने राहावे. पण दुर्दैव असं की माधवी यांचा हा संदेश रवींद्र महाजनी यांच्या पर्यंत पोहोचलाच नाही. कारण हे पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्यांचे निधन झाले.
![Ravindra Mahajani: अभिनेते रवींद्र महाजनी हे घर सोडून गेले - माधवी यांचा त्यांना संदेश, पण.. 2 chautha anka book](https://marathijan.com/wp-content/uploads/2024/02/chautha-anka-book.jpg)
‘चौथा अंक’
माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र