Gashmeer Mahajani: जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाला 6 महिने झाल्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. यात माधवी यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट आठवणी शेअर करत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दल सुद्धा अनेक खुलासे केले आहे. त्यामुळे हे पुस्तक सध्या खूप चर्चेत असून याची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. (Actor Gashmeer Mahajani got life thanks to Rashmi, so he calls her second mother)
अभिनेते रवींद्र महाजनी आणि त्यांच्या पत्नी माधवी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा आता एक प्रसिद्ध अभिनेता बनला आहे. माधवी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात गश्मीरबद्दलही अनेक आठवणी शेअर केल्या आहे. यातीलच एक आठवण म्हणजे गश्मीरला बहिण रश्मीमुळे मिळाले जीवदान आणि यामुळे गश्मीर तिला दुसरी आईच म्हणतो. याबद्दलचा एक प्रसंग माधवी यांनी या पुस्तकात पेज नंबर 42 ते 43 वर शेअर केला आहे.
गश्मीर आणि रश्मी बद्दल माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की “गश्मीर जन्मला तेव्हा मी पस्तिशीत होते. रश्मी आणि गश्मीर यांच्यामधे साडेबारा वर्षांचं अंतर. त्यामुळं त्याचं आवरणं, शाळेत नेणं आणणं हे सारं हौसेनं रश्मीच करायची. एकदा त्याला शाळेत पोचवायला जाताना टू व्हीलरवर रश्मी बसली. गश्मीर गाडीवर बसला आहे असे समजून मागे बसलेल्या गश्मीरशी वाटेत गप्पाही मारल्या. रश्मी शाळेत पोचल्यावर मागे बघते, तर गश्मीर गाडीवर नव्हता. घाबरून रश्मी घरी परत आली. तर गश्मीर तिथेच उभा होता. तो बसण्याच्या आधीच हिने गाडी थेट शाळेत नेली होती. तेव्हा रश्मी घाबरली होती पण आता आम्ही ही गोष्ट आठवून खूप हसतो.”
एकदा रश्मीमुळे गश्मीरला कसे जीवदान मिळाले याबद्दल माधवी यांनी म्हटलंय की “गश्मीर लहान असताना त्याला तेल लावून अंघोळ घालायला बाई यायची. एकदा त्या बाईने गश्मीरला पायावर उताणे घेऊन भराभरा त्याच्या अंगावर पाणी ओतलं. घाईघाईनं त्याला थोडा शेक देऊन ती निघून गेली. थोड्याच वेळात गश्मीरला श्वास लागला. त्यानं डोळे पांढरे केले. काय करावं कुणाला काही सुचेना.
रश्मी त्याला खांद्यावर घेऊन पाठीवर थोपटत फेऱ्या घालू लागली. अचानक गश्मीरच्या नाकातोंडातून बक्कन पाणी बाहेर आलं. मग त्याचा श्वास मोकळा झाला. जीवदानच मिळालं एक प्रकारे. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलेलं होतं. एका निष्काळजीपणामुळं माझ्या नवसासायासानं झालेल्या बाळाचा प्राण धोक्यात आला होता. होय, रश्मी झाल्यावर अनेक व्रतवैकल्यं केल्यानंतर गश्मीरसारखा हिरा माझ्या पोटी जन्माला आला होता. हे सर्व गश्मीरला सांगितले असल्यामुळे तो तिच्यावर खूप प्रेम करतो व तिला दुसरी आईच म्हणतो.” असं माधवी यांनी या पुस्तकात सांगितलं आहे.
‘चौथा अंक’
माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र