Ravindra Mahajani: जेष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘चौथा अंक’ यात रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. यापैकीच एक म्हणजे रवींद्र महाजनी यांच्यामुळे त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीचे झालेले मोठे नुकसान, यामुळे गश्मीर हा काही काळ डिप्रेशनमधे गेला होता. असा खुलासा माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात 99 ते 102 पेज वर केला आहे.
अभिनेता गश्मीर महाजनीने सुरुवातीला दिग्दर्शन क्षेत्रात पाउल ठेवले होते. त्याने एका नाटकाचे दिग्दर्शन सुद्धा केले होते. यात त्याची यशस्वी सुरुवात झाली होती. यानंतर गश्मीरने चित्रपट काढायचे ठरवले. यासाठी त्याने वडील रवींद्र महाजनी यांची परवानगी घेतली होती. याबद्दल सांगत माधवी म्हणाल्या की “रवीने आधी ‘सत्तेसाठी काहीही’ हा मराठी चित्रपट काढला होता. त्यानंतर जर पुन्हा दुसरा मराठी चित्रपट काढला तर त्यासाठी तीस लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र सरकार देते. गश्मीर त्याच्या बाबांना म्हणाला, ‘तुम्ही माधवी आर्ट्सतर्फे एक चित्रपट काढलेला आहे. आता मी काढतो. म्हणजे आपल्याला निदान तीस लाख नक्की मिळतील.’ त्यावर रवीने होकार दिला.” असं माधवी यांनी सांगितलंय.
यानंतर गश्मीरने त्याच्या या पहिल्याच चित्रपटाची तयारी सुरु केली. पण यात त्याचे वडील अभिनेते रवींद्र महाजनी यांच्यामुळे गश्मीरचे खूप मोठे नुकसान झाले होते आणि तो पुढे काही काळ डिप्रेशनमधे सुद्धा गेला. या विषयीचा खुलासा करत माधवी यांनी सांगितलंय की “मग गश्मीर एका फायनान्सरकडे गेला. त्याला त्यानं सांगितलं की, ‘आपण एक मराठी चित्रपट काढू यात.’ सुहास शिरवळकर यांची प्राक्तन नावाची ती कादंबरी होती. मला व गश्मीरला ती आवडली होती व यावर चांगला चित्रपट तयार होऊ शकेल असं वाटलं. चित्रपटाचं नाव ठरलं, ‘नील डिसोझा परत आला’ गश्मीरनं फायनान्सरला हमी दिली की, हा चित्रपट चालेल तितका चालेल. पण त्यावर आम्हाला मिळणारे तीस लाख मी तुम्हाला देईन. तसे लिहून देतो. तीस लाखाची सिक्युरिटी मिळतेय म्हटल्यावर तो फायनान्सर नवीन चित्रपटासाठी खर्च करण्यास तयार झाला.
सर्व तयारी झाली. गश्मीरनं सायनिंग अमाऊन्ट देतो म्हणून कलाकारांना शब्द दिला. या चित्रपटात रवीलाही भूमिका दिली. फायनान्सरकडून चेक मिळण्याच्या आदल्या दिवशी रवी म्हणाला, ‘त्या फायनान्सरशी माझी भेट घडवून आण.’ त्या वेळी रवीचे एके ठिकाणी चित्रण चालू होते. तिथे गश्मीर फायनान्सरला घेऊन रवीकडे गेला. तेव्हा अचानक रवी फायनान्सरला म्हणाला, ‘तुम्ही तीस लाख घेणार आहात ना? मला दहा लाख द्यायला हवेत.’ हे ऐकल्यावर फायनान्सर बिथरला. व्यवहारात काहीतरी गडबड दिसतेय असे वाटून त्यानं व्यवहारातून काढता पाय घेतला.
दोन वर्षे खेटे घालून गश्मीरनं प्रयत्नपूर्वक त्या फायनान्सरला तयार केलं होतं. हातातोंडाशी आलेला घास, गश्मीरचा काहीही दोष नसताना काढून घेतला गेला होता. त्याच्या महत्त्वाकांक्षेवर रवीच्या एका वाक्यामुळे पाणी पडलं होतं. गश्मीरला या गोष्टीचा धक्का बसला. फायनान्सरकडून पैसे मिळाले की लगेच दुसऱ्याच दिवशी सायनिंग अमाऊन्ट देईन असं गश्मीर कलाकारांना सांगून बसला होता. आता आपण इतरांना शब्द दिलेला असताना तो पाळता येणार नाही या कल्पनेने गश्मीर निराश झाला. अजून तो चित्रपटक्षेत्रात नवीन होता. सुरुवातीलाच आपल्याकडून अशी फसवेगिरी होता कामा नये अशी त्याची फार इच्छा होती. आणि मुख्य म्हणजे त्याचं स्वप्न, त्याची महत्त्वाकांक्षा सत्यात उतरण्याच्या क्षणीच ती विरून गेली. त्यामुळे आता त्याच्या डोक्यातून तो विषय जाईना.” असा खुलासा माधवी यांनी केला आहे.
पुढे गश्मीरने अनेक संकटांना तोंड देत, खूप मेहनत करत आणि घर गहाण ठेवून कर्ज घेऊन हा चित्रपट त्याने पूर्ण केला पण हा चित्रपट फ्लॉप झाला. याविषयी माधवी यांनी सांगितलंय की “जिवावर उदार होऊन तयार केलेला हा चित्रपट फारसा चालला नाही. याला अनेक कारणं होती. गश्मीरनं लहानमोठी शूटिंगची कामं केली होती. पण चित्रपट म्हणजे मोठं प्रकरण असतं. त्यात दिग्दर्शन, कॅमेरा, कलावंत अशा अनेक गोष्टींची जबाबदारी त्याच्यावर अचानक येऊन पडली. वडिलांनी खो घातला नसता तर मी आरामात दिग्दर्शन करण्याचं काम केलं असतं आणि बाकी सगळ्या जबाबदाऱ्या इतरांनी उचलल्या असत्या; त्यांच्यामुळं आपण या साऱ्या गुंत्यात अडकलो अशी अपेक्षा भंगाची गडद छाया त्या काळात गश्मीरच्या मनात असणार.
त्यातच राहतं घर गहाण ठेवून घेतलेल्या कर्जाची सतत टांगती तलवार. नवीन चित्रपटाची एवढी मोठी जबाबदारी पेलण्यासाठी जो मनाचा शांतपणा लागतो, तो त्याला त्या वेळी अजिबात मिळाला नव्हता. कारणं काहीही असतील; पण या चित्रपटात गुंतवलेले पैसे बुडाले. बरेच प्रयत्न करून गश्मीरनं हा चित्रपट पूर्ण केला. पण यात त्याची चार वर्षे गेली. त्यामुळे त्याचे मनःस्वास्थ्य हरवल्यासारखे झाले. काही काळ गश्मीर डिप्रेशनमधे होता.” असं माधवी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात सांगितलं आहे.

‘चौथा अंक’
माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र