“मला किडनॅप केलेलं, सतत मारायला सांगितलं होतं..” अभिनेता भूषण कडूचा खुलासा

भूषण कडू

अभिनेता भूषण कडू मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि विविध शो मधून भूषणने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या नटाच्या आयुष्यात करोना काळात मात्र मोठे संकट कोसळले होते. यादरम्यान त्याच्या पत्नीचे निधन झाले आणि अभिनेता नैराश्याचा सामना करत होता. बराच काळ तो सिनेविश्वापासूनही दुरावाला. अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना त्याने त्याच्या आयुष्यातील आणखी एका कठीण प्रसंगाविषयी सांगितले आहे.

भूषणचा अपहरण झाल्याचा खुलासा

भूषणने एका मुलाखतीमध्ये बोलताना खुलासा केला की, पुण्यात त्याचे अपहरण झाले होते आणि त्याला तीन दिवस डांबून ठेवण्यात आले होते. हा धक्कादायक प्रसंग सांगताना कडू म्हणाला की, “जेव्हा चांगलं चाललेलं असतं तेव्हा, कुठेतरी काहीतरी आपल्या पाठीमागे वाईट घडत असतं. त्याची आपल्याला कुणकुण नसते. मला किडनॅप पण करण्यात आलं होतं. तीन दिवस पुण्यात किडनॅप करुन ठेवण्यात आलं होतं.” असं अल्ट्रा झकासला दिलेल्या मुलाखतीमध्ये भूषण बोलत होता.

त्या भयंकर आठवणीबद्दल सांगताना तो पुढे म्हणाला की, “ज्या माणसाने सुपारी दिली होती त्याने एकाला सांगितलं होतं की याला मध्ये मध्ये मारत राहा, पण त्याने मला नाही मारलं. तो हाताने आवाज काढायचा आणि समोरच्याला सांगायचा की मी त्याला मारतोय. कारण तो माणूस मला भूषण कडू म्हणून ओळखत होता. तो म्हणाला की, सर मी तुम्हाला मारु शकत नाही. तुम्ही कलाकार आहात. मी तुमचं काम बघतो. माझी मुलंही तुमची कामं बघतात.”

पत्नीचं निधन

भूषणबद्दल सांगायचं झाल्यास, ‘घडलंय बिघडलंय’ने त्याला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय त्याने सात वर्षे ‘कॉमेडी एक्सप्रेस’ हा शो केला. अभिनेत्याने ‘बिग बॉस मराठी’चा पहिला सीझनही गाजवला होता. तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात झळकला होता. करोना काळात त्याच्या पत्नीचं निधन झालं. त्या काळात भूषणबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या, त्यामुळं एक वेळ अशी आली की त्याला हा शो सोडावा लागला.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top