लाडकी बहीण योजना विरोधात बँक कर्मचारी संपावर जाणार | Ladki Bahin Yojana

Bank Employees Will Held Strike against Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्यापर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यादरम्यान आता लाडकी बहीण योजना विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात बँक कर्मचाऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी संपाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर ती राबवताना सुरक्षित वातावरण मिळत नसल्याचं बँक कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडून बँक कर्मचाऱ्यांचा झालेला छळ आणि हल्ला यामुळे हे संपाचं हत्यार उचलण्यात आल्याचं त्याचं म्हणणं आहे. (Bank Employees Will Held Strike against Ladki Bahin Yojana)

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) हा संप पुकारला आहे. UFBU ही नऊ बँक युनियनची संघटना आहे. UFBUचे राज्य समन्वयक देवीदास तुळजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लाडकी बहीण योजनेमुळे बँकांमध्ये मोठा गोंधळ माजला आहे. सरकारकडून नियोजनाचा तसंच संवाद साधण्याचाही अभाव आहे. या योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राज्यातील विविध भागात योजनेचे लाभार्थी आणि स्थानिक नेत्यांकडून बँक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण, गैरवर्तन करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आम्ही एक दिवसीय संप करण्याचा निर्णय घेतला’ असल्याचं ते म्हणाले.

देवीदास तुळजापूरकर यांनी बँक कर्मचाऱ्यांना मारहाण होण्यामागे नेमकं काय कारण आहे याचीही माहिती दिली, ते म्हणाले, ‘सरकारने योजना योग्यरित्या कार्यान्वित होण्यासाठी बँकांना सुरक्षा आणि अतिरिक्त कर्मचारी देण्याची गरज होती. काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून सेवा शुल्क कापलं जात होतं. मात्र हे शुल्क बँकांनी नियमानुसार आकारलं आहे. ज्यांच्या खात्यातून सेवा शुल्क कापलं गेलं, त्यांच्या खात्यात आधीच पैसे नसल्याने बँक ते वसूल करू शकलं नाही, मात्र खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यानंतर बँकेच्या नियमानुसार सेवा शुल्क आपोआप कापलं जात आहे. त्यावरुनच खातेधारक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची होत आहे. काही स्थानिक नेते यात अधिक वाद निर्माण करत असून बँक कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही चुकीशिवाय त्यांना धमकी दिली जात आहे.’

राज्यातील बीड, जालना, लातूर, धुळे, पुणे या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक खराब आहे. बँक खातं चालू करणं, ते आधार लिंक करणं आणि बंद पडलेली बँक खाती पुन्हा सुरू करणं, या कामांसाठी मोठी गर्दी होत आहे. लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांवर अनेक हल्ले झाले आहेत, असंही बँक कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आहे.

बँकांच्या संपाबाबत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं की, “बँक यूनियनने कोणतंही कठोर पाऊल उचलण्याआधी सरकारशी चर्चा करावी. आम्ही बँक कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तयार आहोत. लाडकी बहीण योजना सर्वसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली असून या योजनेची योग्यरित्या तसंच सुरळित अंमलबजावणी करण्यासाठी बँकांनी सरकारची मदत करावी,” असंही सावे म्हणाले.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top