जळगावातील खानदेश महोत्सवात दिव्यांग विद्यार्थ्यांचा डान्स पाहताना अभिनेत्री अलका कुबल भावूक झाल्या. उडान दिव्यांग फाउंडेशनचे विद्यार्थी या महोत्सवाद नृत्य सादर करत होते. अगदी सामान्य मुलांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थीसुद्धा वेगवेगळ्या गीतांवर हातवारे आणि हावभाव करत नाचताना पाहून अलका कुबल भारावून गेल्या. दिव्यांग विद्यार्थ्यांचं सादरीकरण पाहून त्या थक्क झाल्या होत्या. या कार्यक्रमानंतर सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत त्यांनी फोटोसुद्धा काढला. जळगावातील शिवतीर्थ मैदानावर खानदेश करिअर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांचं सादरीकरण केलं. “मुलांचे पालक आणि शिक्षक यांनी ज्या पद्धतीने हा डान्स बसवला होता, ते पाहून मी खूप भावूक झाले. ही मुलं नशीबवान आहेत की त्यांना असे पालक मिळाले आहेत. देवाची मुलं, स्पेशल चाइल्ड अशी ही मुलं असतात,” अशा शब्दांत अलका यांनी भावना व्यक्त केल्या.
सासू-सासऱ्यांबद्दल झाल्या व्यक्त
जळगावातील या कार्यक्रमात अलका कुबल यांनी त्यांच्या सासरच्या आठवणींनाही उजाळा दिला. “1991 मध्ये ‘माहेरची साडी’ हा चित्रपट केला. त्यानंतर प्रेक्षक रसिकांनी खूप प्रेम दिलं, आशिर्वाद दिले. ‘माहेरची साडी’ या चित्रपटात जसे माझे सासू-सासरे होते, त्याउलट प्रत्यक्षात लग्नानंतर मला प्रेमळ सासू सासरे, प्रेमळ नवरा मिळाला, मुलीसुद्धा तशाच. हे सर्व माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मी करिअर करू शकले. शूटसाठी 11-11 महिने घराबाहेर होते. मात्र माझ्या सासूने सर्व घर सांभाळलं होतं. मुलींवर चांगले संस्कार केले. त्यामुळे बाहेर असतानासुद्धा मी निर्धास्त राहिले. फक्त कुठला सणवार, किंवा मुलींचे वाढदिवस असले की मी घरी यायचे. आतापर्यंत मी जवळजवळ 350 चित्रपट केले. परमेश्वराने मला खूप यश दिलं, लोकांनी रसिकांनी मला खूप प्रेम दिलं,” असं त्या म्हणाल्या.
हुशार विद्यार्थ्यांची मदत करण्याची सरकारकडे मागणी
यावेळी अलका कुबल इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाल्या. “पॉईंट-पॉईंट मार्कांसाठी मुलांचे ॲडमिशन हुकतात. जात धर्म येतं. काही जणांना हे कदाचित आवडणार नाही, पण मला अनेकदा वाटतं की मेरिट बघावं, स्किल बघावेत आणि आर्थिक परिस्थिती नसेल तर सरकारने मदत करावी. मुलं किती हुशार असतात. मात्र कोणी रिक्षावाला असेल, कोणी हातगाडेवाला असेल तर परिस्थिती नसल्यामुळे त्यांची मुलांना प्रवेश घेऊ शकत नाहीत. माझ्या मुलीची दीड वर्षांची फी 1 कोटी रुपये आहे. ही इतकी फी साधा रिक्षावाला आणि हातगाडीवाला कसं भरू शकतील? त्यामुळे चांगले मार्क मिळाले असतील तर अशा विद्यार्थ्यांना सरकारने मदत करावी. शासनाने मेरिट बघावं आणि त्यांना आवर्जून प्रोत्साहन द्यावं,” अशी मागणी त्यांनी केली.
‘छावा’बद्दल काय म्हणाल्या?
“यश सर्वांनाच मिळतं, मात्र यश मिळाल्यावर जमिनीवर पाय असणं खूप महत्वाचं असतं. आजच्या काळामध्ये तुमच्याकडे पैसा किती आहे हे कोणी बघत नाही, मात्र तुमच्याकडे माणसं किती आहेत हे फार महत्वाचं आहे,” असंही मत अलका यांनी यावेळी मांडलं. यावेळी त्यांनी विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाबद्दलही प्रतिक्रिया दिली. “छावासारखे चित्रपट यायला हवेत. यानिमित्ताने एक चांगली कलाकृती लोकांसमोर आली. महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये जागरूकता आली. सतत आपण डान्स गाण्याचे कार्यक्रम बघत असतो, पण असं काही ऐतिहासिक आलं तर उपदेश देण्यापेक्षा आपण त्यांना धडा देतो असं मला वाटतं,” असं त्या म्हणाल्या.
‘लाडकी बहीण योजने’बद्दल काय म्हणाल्या?
राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “हे सरकार महिलांसाठी खूप चांगलं काम करतंय. लाडकी बहीण योजना जिंदाबाद.” अलका कुबल या लवकरच ‘वजनदार’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.