Ajit Pawar vs Rohit Patil: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसंतसं राजकीय वातावरण हे अधिकच तापू लागलं आहे. त्यातच नवनवे आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी तासगावमध्ये बोलताना आर. आर. पाटील यांच्याबाबत एक खळबळजनक विधान केलं. ‘आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला.’ असं म्हणत अजितदादांनी आता एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
तासगावच्या सभेत अजितदादा पवार (Ajit Pawar) म्हणाले की “माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणाले याच्यावर 70 हजार कोटीचा आरोप करूया.. सारखं 70 हजार, 70 हजार म्हणायचे.. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावर आरोप झाला ना त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची 1 मेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च हा 42 हजार कोटीचा आणि मला 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणाले..”
“42 हजार कोटी खर्च झाले आजपर्यंत आणि तिथे 70 हजार कोटी.. नाही.. आकडा जेवढा मोठा तेवढं लोकांना वाटतं की, असंल बरं का.. असंल बरं का.. झालं माझी वाटच लागली. त्यातून एक फाईल तयार झाली. ती फाईल गृहखात्याकडे जाते. ह्यांनी.. (आर. आर. पाटील) त्या फाइलवर अजित पवाराची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत राव!”
“मला हे ही माहीत नव्हतं.. नंतर राष्ट्रपती राजवट आली. आपण पृथ्वीराजबाबाचा पाठिंबा काढून घेतलं. सरकार गेलं राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यावेळेसचे राज्यपाल म्हणाले या फाइलवर मी सही करणार नाही. निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे मी असं काही कोणाला करणार नाही.”
“निवडून आले देवेंद्र फडणवीसचं सरकार.. आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं की, या इकडे.. मला घरी बोलावलं.. म्हणाले हे बघा.. ही सही मुख्यमंत्र्याकरिता राहिली होती. तुमच्या आबाने तुमची चौकशी सुरू करण्यासाठी सही केली… आणि खरंच त्याची सही होती. मला इतकं वाईट वाटलं.. ठीकए म्हटलं.. आपला जीवाभावाचा सहकारी.. पण काय.. आपलं काही तरी चुकलं असेल म्हणून आपल्याला कामाला लावून बाबा… पण हे असं नाही झालं पाहिजे.” असं अजित पवार हे जाहीर सभेत म्हणाले आहे.
रोहित पाटलांची प्रतिक्रिया काय?
माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी माझा केसानं गळा कापला! या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विधानावर दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र आणि तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित पाटील म्हणाले की “आज आबा जाऊन साधारण नऊ, साडे नऊ वर्षे झाली. आज आबा असते तर त्यांनी या आरोपांचं प्रत्युत्तर दिलं असतं. पण आबांच्या पश्चात नऊ वर्षांनंतर अजित दादांनी हे विधान का केलं असावं हे मला माहिती नाही. आता दादा ज्येष्ठ आहेत आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केलेलं आहे. त्यामुळं मी दादांच्या बाबतीत आजिबात बोलणार नाही. पण मी कुटुंब आणि कार्यकर्ते म्हणून आम्हाला सर्वांना याचं दुःख झालेलं आहे. आबांच्या बाबतीत जी भावना होती ती इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीनं बाहेर येणं याचं दुःख होतंय.”
“माझ्या मतदारसंघातून त्यांचे जे उमेदवार उभे आहेत, ते गेली साडेचार वर्षे लोकांमध्ये नव्हते त्यामुळं लोकसभेला लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे, त्यानंतर आता ते पुन्हा विधानसभेसाठी उभे आहेत. त्यामुळं त्यांच्याबाबतीत लोकांमध्ये कुठलीच भावना नाही, त्यामुळं कुठेतरी आपल्या उमेदवाराची किमान ओळख लोकांना व्हावी यासाठी त्यांनी हे विधान केलं असेल. पक्षात फूट पडल्यांनतर अचानक ही भावना व्यक्त करणं ती पण आबा गेल्यानंतर एवढ्या वर्षानंतर याचं दुःख होतं. या विधानाचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, पण कार्यकर्त्यांना दुःख वाटतंय” अशा शब्दांत रोहित पाटील यांनी अजित पवारांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.