Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सवलती

Maratha Reservation Manoj Jarange Patil

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मान्य केल्या असून याबाबत मध्यरात्रीच अध्यादेश काढण्यात आले आहेत. यांनतर मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे. (Maratha Reservation Manoj Jarange Patil – Maratha Community will get the rights of OBC till reservation)

नवी मुंबईत मराठ्यांचा जनसागर उसळला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा समाज नवी मुंबईतील वाशी येथे दाखल झाला होता. मराठा समाजाचा हा विराट मोर्चा घेऊन जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन करण्यावर ठाम होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकार मोठे अडचणीत सापडले होते. तसेच मराठ्यांचा हा जनसागर बघता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करणे हाच पर्याय महाराष्ट्र सरकारकडे होता. आणि शेवटी तेच झाले आहे. मराठा आंदोलक वाशीतून मुंबईच्या दिशेने निघणार तेवढ्यात त्यांना आनंदाची बातमी मिळाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस

मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून याबाबत मध्यरात्रीच अध्यादेश काढण्यात आले आहेत. यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः येऊन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अध्यादेश सोपवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे. तसेच या दोघांनी एकमेकांना पेठे भरुन, गळाभेट घेत विजयी गुलाल उधळला आहे. (Maratha Reservation Government Order GR)

आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सर्व सवलती मिळणार

मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतलं आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजासाठी काही महत्वाच्या घोषणाही केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि ओबीसींच्या सर्व सवलती दिल्या जातील. तसेच आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकऱ्याही दिल्या जाणार आहेत. मराठा समाजासाठी असलेल्या सर्व महामंडळांना न्याय देण्याचं काम राज्य सरकार करेल असंही मुख्यमंत्री म्हणाले आहे.

जरांगेंनी केले मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक

मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या मान्य होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. “सगेसोयऱ्यांसाठी या नवीन शब्दाचा उल्लेख पहिल्यांदाच करण्यात आला आहे. राजपत्र आणि अध्यादेश इतक्या लवकर जारी करणे, हे इतिहासात पहिल्यांदाच झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. समाज म्हणून त्यांचा विरोध संपला.” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे.

मराठा समाजाचा राज्यभरात विजयी जल्लोष

मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य करताच मराठा समाजाने राज्यभर विजयी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी गुलाल उधळत फटाके फोडण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी तर डीजेच्या तालावर नाचत मराठा समाजाने हा विजय साजरा करण्यास सुरुवात केली आहे. मराठा समाजाचा लढा यशस्वी ठरल्याने आज मराठा समाजाची दिवाळी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top