IND vs AUS 4th Test: ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. अशातच 12 वर्षांनंतर कांगारूंना बॉर्डर गावस्कर ट्रॉफी राखण्यात यश आलंय. तसेच भारतीय टीमचे भारतीय टीमचं WTC फायनलचं गणित बिघडल्याचं दिसतंय. यासाठी आता भारतीय टीमला दुसऱ्या टीमवर अवलंबून राहावे लागेल.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आघाडीच्या फलंदाजांच्या निष्क्रिय फलंदाजीचा फटका टीम इंडियाला बसला. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर टीम इंडियाच्या वाटेला गोलंदाजी आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 474 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव गडगडला. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने पहिल्या डावात चांगली झुंज दिली. शतकी खेळी करत भारतावरील फॉलोऑनचं संकट टाळलं. तसेच भारताला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. भारताने पहिल्या डावात 369 धावांची खेळी केली. तरी ऑस्ट्रेलियाकडे 105 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने या धावांच्या पुढे खेळताना 234 धावांची खेळी केली. शेपटाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. तसेच भारतासमोर पाचव्या दिवशी 340 धावांचं मोठं आव्हान ठेवलं. खरं तर हे आव्हान काही गाठणं सोपं नव्हतं. त्यामुळे ड्रॉ करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. टीम इंडिया 155 धावांवर ऑलआऊट झाली आणि ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी विजय मिळवला.
रोहित विराटचा फ्लॉप शो
कर्णधार रोहित शर्मा 9, केएल राहुल 0, विराट कोहली 5, रवींद्र जडेजा 2, नितीश कुमार रेड्डी 1 धाव करून बाद झाले. दुसरीकडे यशस्वी जयस्वालने 84 धावांची झुंजार खेळी केली. सामना वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. खरं तर ऋषभ पंतच्या एका चुकीच्या फटक्यामुळे भारताची लय तुटली. ऑस्ट्रेलियाला सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळाली. त्यानंतर यशस्वी जयस्वालला वादग्रस्त पद्धतीने रिव्हयूत बाद झाला. त्यामुळे भारताची लय पूर्णपणे बिघडून गेली. शेपटाचे फलंदाज 20 षटकं खेळून काढतील अशी स्थिती नव्हती. त्यामुळे भारत हा सामना गमवणार हे स्पष्ट झालं होतं. रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याच्या धावांपेक्षा जसप्रीत बुमराहच्या विकेट जास्त आहेत. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज त्याच्यापेक्षा चांगलं खेळतात असं दिसून आलं आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा सततचा खराब फॉर्म असूनही वारंवार मिळणारी संधी भारताच्या पराभवाचं कारण ठरलं. नाव मोठं लक्षण खोटं असं विराट आणि रोहितची अवस्था झाली आहे. खरंतर महत्वाच्या टेस्ट क्रिकेट सामन्यात या मोठ्या प्लेयर्स कडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा करणेही आता मूर्खपणा वाटत आहे. या अगोदरच न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारताने 3-0 ने गमावली तिथेच सर्व काही संपलं होतं. पण तरीही या आउट ऑफ फॉर्म असलेल्या खेळाडूंना पुन्हा पुन्हा संधी देण्यात आली. रोहित शर्माची टेस्ट कप्तानी तर एकदम खराब सुरु आहे, तरीही त्यालाच कप्तानी देण्यात येतेय हा निव्वळ मूर्खपणाच म्हणावा लागेल.
ऑस्ट्रेलियात टीम इंडियात कमबॅक करेल अशी आशा होती. पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारताने चांगली कामगिरी केली. पहिल्याच कसोटी सामन्यात विजय मिळवून आघाडी घेतली होती. त्यामुळे आशा वाढल्या होत्या. मात्र दुसऱ्या कसोटीपासून रोहित शर्माचं नेतृत्व आणि फलंदाजी यामुळे टीम इंडियाचं नुकसान झालं. भारताला दोन सामन्यात पराभवाचं तोंड तर एक सामना ड्रॉ झाला. आता रोहित शर्माने तर प्रामाणिकपणे टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती घ्यावी आणि जसप्रीत बुमराहकडे कप्तानी सोपवायला हवी.
भारतीय टीमचं WTC फायनलचं गणित बिघडलं
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात कांगारूंनी टीम इंडियाचा दारुण पराभव केला आहे. त्यानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची गणित बिघडली आहेत. मेलबर्न कसोटीत पराभूत झाल्यानंतर 2025 च्या WTC फायनलमध्ये पोहोचण्याचे भारताचे स्वप्न अद्याप भंगलेलं नाही. टीम इंडिया अजूनही फायनलमध्ये जाऊ शकते. WTC च्या फायलनसाठी भारताचे संपूर्ण समीकरण जाणून घेऊया.
- WTC फालयनमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला काहीही करून सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटची कसोटी जिंकावी लागेल.
- जर टीम इंडियाने अखेरची कसोटी गमावली किंवा अखेरच्या कसोटीत टीम इंडियाला सामना अनिर्णयीत किंवा ड्रॉ राखला, तर टीम इंडिया बाहेर अन् ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये धडक मारेल.
- WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला इतर संघांवर अवलंबून राहावं लागणार आहे. श्रीलंकेच्या संघाने आगामी मालिकेत ऑस्ट्रेलियाला हरवलं तरच टीम इंडिया फायनलमध्ये पोहचू शकेल.
- श्रीलंकन संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-0 ने जिंकली किंवा 0-0 अशी बरोबरी सोडली तरच भारत WTC फायनलमध्ये पोहोचू शकेल. त्याआधी सिडनी कसोटी भारताला जिंकणं गरजेचं आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा पराभव करून साऊथ अफ्रिकेने फायनलमध्ये जागा मिळवली आहे. त्यानंतर आता दुसरी टीम कोणती असेल? यावरून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.
IND vs AUS दोन्ही संघांची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलियाचा संघ : उस्मान ख्वाजा, सॅम कोनस्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरे (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन, स्कॉट बोलँड
टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप