माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन – अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला! Dr. Manmohan Singh

Dr. Manmohan Singh

Dr. Manmohan Singh Passes Away: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन (Dr. Manmohan Singh Passes Away) झालं आहे. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेलं. मनमोहन सिंह यांच्या उदारीकरणाच्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट केलं.

सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर 2009 साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. पंतप्रधान असूनही त्यांच्या विनम्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे.

डॉ. मनमोहन सिंह यांची कारकीर्द (Dr. Manmohan Singh)

डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली.

सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.

1982 ते 1985 या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं. त्यानंतर 1985 ते 1987 या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं.

सन 1991 सालाच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. आर्थिक उदारीकरणाच्या माध्यमातून सरकारी नियंत्रण कमी करण्यात आले, थेट विदेशी गुंतवणुकीला (FDI) प्रोत्साहन दिले, आणि संरचनात्मक सुधारणा (Structural Reforms) लागू केल्या. या बदलांमुळे भारताची अर्थव्यवस्था जागतिक बाजारासाठी खुली झाली.

सन 1996 साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर मनमोहन सिंह यांनी देशाचे 13 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ते देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. म्हणजेच ते सलग 10 वर्ष भारताचे पंतप्रधान होते. लोकसभेची निवडणूक न जिंकणारे आणि राज्यसभेचे सदस्य असताना हे पद भूषविणारे ते पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक विकास आणि सामाजिक नियोजनावर विशेष भर देण्यात आला.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे अत्यंत साधे जीवन जगले. त्यांच्याकडे फार मोठी संपत्ती देखील नव्हती. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एकूण संपत्ती ही 15 कोटी 77 लाख रुपयांची आहे. राज्यसभेत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दिल्ली आणि चंदीगडमध्येही त्यांचा फ्लॅट आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार मनमोहन सिंह यांच्यावर कोणतेही कर्ज नव्हते.

एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली. प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. आता 26 डिसेंबर रोजी त्यांचं निधन झालं आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top