सरपंच संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम हादरवणारा, सर्जन पण म्हणाला अशी केस कधीच पाहिली नाही – अजित पवार | Sarpanch Santosh Deshmukh

Sarpanch Santosh Deshmukh

Sarpanch Santosh Deshmukh: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. या हत्त्याकांडात धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) हा खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेऊ नका, अशी मागणी मस्साजोग गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या खातेवाटपामध्ये धनंजय मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 14 दिवस होऊन गेले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात विष्णू चाटे याच्यासह चौघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. मात्र अद्यापही या प्रकरणातील तीन आरोपी फरारच आहेत. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जवळचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मंत्री धनंजय मुंडे हे आरोपींना वाचवत असल्याचा आरोप मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून आणि विरोधी पक्षाकडून करण्यात येतोय.

अजित पवारांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत या घटनेतील मास्टरमाईंड कोणीही असो, त्याला सोडणार नाहीस असं आश्वासन अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिलं . अजित पवारांच्या समोर धनंजय मुंडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर आज पुन्हा अजित पवारांनी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण आरोपीला सोडणार नाही, असा इशारा बारामतीत दिला.

अजित पवार म्हणाले, “बीडमध्ये जी घटना घडली त्यांची क्रूरपणे हत्या केली त्यांच्या परिवारास भेटण्यासाठी गेलो. काहीही जरी झालं त्याचा मास्टर माईंड कुणीही असेल तर त्याला सोडायच नाही.. कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. सिव्हिल सर्जन म्हणाला पोस्टमार्टम करताना इतकी वाईट केस कधीच बघितली नाही. अशा घटनेने आम्हाला शरमेन मान खाली जाते. या नालायकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय सोडायच नाही. फास्ट ट्रॅकवर केस चालवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही. आपण विचारावर ठाम आहोत. आपण भाजप सोबत असलो तरी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने काम करू. संघर्ष करणे हा राष्ट्रवादीचा धर्म आहे.”

धनंजय मुंडे विरोधात घोषणाबाजी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल (22 डिसेंबर) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलीय. तर याच मुद्यावरून आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी संतोष देशमुख हत्त्या प्रकरणावरून अजित पवारांच्या समोरच आता धनंजय मुंडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी होत आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल

नुकतंच भाजपचे आमदार सुरेश धस आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा अंगावर काटा आणणारा तपशील विधानसभेत मांडला होता. त्यानंतर आता सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाल्याचे म्हटले आहे. आठ पानांचा हा अहवाल वाचल्यास संतोष देशमुख यांना किती छळ करुन भयंकर क्रूर पद्धतीने मारण्यात आले, याची कल्पना येऊ शकते. आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल सीआयडीकडे सुपूर्द केला आहे.

शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे की संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावर विविध ठिकाणी मुका मार दिल्याने अतिरक्तस्राव झाला आहे. त्यामुळे ते शॉकमध्ये गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.’ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अहवालात संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण ‘हॅमरेज अॅण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिज’ असे नमूद करण्यात आले आहे. देशमुख यांच्या छातीवर, हात-पाय, चेहरा, डोके या भागात मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडला होता.

दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांना पोलिसांनी अटक केली आहे. विष्णू चाटेला पोलिसांनी बुधवारी बीड शहराजवळ ताब्यात घेतले होते. विष्णू चाटे हा वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता याप्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून आणि विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top