Chhagan Bhujbal: महायुती सरकारचा विस्तार नुकताच पार पडला आहे. मात्र या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाने महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे भुजबळांना आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांनी भुजबळांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे आता छगन भुजबळ आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत. भुजबळांनी त्यांची नाराजी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली आहे. तसेच त्यांना पुढच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भुजबळ लवकरच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याचे दिसतंय. नाराज भुजबळांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही का? पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल? यावर भुजबळ म्हणाले, “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, तसेच हा लढा मंत्रीपदाचा नाही, तर लढा अस्मितेचा आणि अपमानाचा आहे. मी पुन्हा उभा राहील, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले असून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिकमध्ये दाखल झाले. यानंतर आज छगन भुजबळ यांनी येवल्यातील (Yeola) कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की “लोकसभा निवडणुका लागल्या, अजित दादा पवार यांनी मला बोलवले. मी लोकसभेचे तिकीट मागितले नव्हते, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत होते. त्यावेळी अमित शहा यांनी सांगितले की नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांनी लढवावी. तीन आठवडे नाव जाहीर केले नाही. त्यानंतर मी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. अजित पवार बोलले भुजबळांनी घाई केली, मग इतके दिवस का नाही सांगितले? मी दूध पिता बच्चा आहे का? मला कळत नाही. त्यानंतर आमचा उमेदवार पडला. मी राज्यसभेवर जातो, ४० वर्ष झाले असे मी बोललो. मात्र अजित दादांच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे वहिनीला राज्यसभेवर पाठवले. साताराची जागा आम्ही भाजपला सोडली. त्याबदल्यात पियूष गोयल यांची जागा आम्हाला मिळणार होती. मकरंद पाटील यांच्या भावाची जागा मला द्या. मात्र मी शब्द दिला आहे असे मला सांगितले. सगळ्यांच्या चर्चा होतात मग आपल्या का नाही? त्यानंतर मग मी येवल्यात येवून आमदारकी लढवली.”
“आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळांना पटेल, तटकरे यांनी बोलवले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेवून भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू, असे सांगितले. मकरंद पाटील यास मंत्रिपद द्यायचे अन् त्याच्या भावाला खाली बोलवायचे. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले, त्यांना मी काय तोंड देवू. त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्री पदाची शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा.”
“हा लढा मंत्रीपदाचा नाही, तर अस्मितेचा आहे, लढा अपमानाचा आहे. मी पुन्हा उभा राहील, लोकशाही आहे. पटेल, तटकरे यांचे कॉल पण ते ऐकत नसल्याचे सांगितले. फडणवीस देखील अजित पवारांना बोलले, भुजबळांना मंत्री करा. पण त्यांनी ऐकले नाही. सरकारी पक्षात असल्याने बोलता येत नाही. जे झाले ते लोकांच्या कानावर टाकणे गरजेचे आहे. विविध पक्षातील लोक नाराज झाले, पण दादांचा वादा महत्त्वाचा आहे. मी कुठेच जाणार नाही, इथेच राहणार आहे. उद्या समता परिषद मेळावा आहे. मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. कोणीही खचून जावू नका, निराश होवू नका.” असे आवाहन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केले आहे.