ठाकरेंशी बंडखोरी नंतर नाचले, आता शिंदेंनी तिकीट कापताच ढसाढसा रडले | Palghar Shrinivas Vanga

Palghar Shrinivas Vanga

Shrinivas Vanga: ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या राजकारणात श्रीनिवास वनगा यांचीच सध्या चर्चा रंगली आहे. ‘ते कालपासून वेड्यासारखं वागतात.. आत्महत्या करणार असंच बोलतात.. बोलतात माझं आयुष्य संपून गेलं.. माझी चूक झाली की मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला.’ असं खळबळजनक विधान शिवसेना शिंदे गटाचे पालघरमधील विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या श्रीनिवास वनगा यांना अशी अपेक्षा होती की, पालघरमधून त्यांनाच पुन्हा आमदारकीचं तिकीट मिळेल. पण ऐनवेळी राजेंद्र गावित यांना भाजपमधून शिवसेनेत घेत शिंदेंनी त्यांना तिकीट दिलं आणि श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं. ही गोष्ट श्रीनिवास वनगा यांच्या अत्यंत जिव्हारी लागली असून ते ढसाढसा रडत होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जेव्हा ते गुवाहाटीला गेले होते तेव्हाचे त्यांचे नाचत असतानाचे व्हिडीओही आता खूप व्हायरल होत आहे. तेव्हा बंडखोरी करत नाचत होते आणि आता उद्धव ठाकरेंना देव माणूस म्हणत आहे असं म्हणत अनेकजण श्रीनिवास वनगा यांना ट्रोलही करत आहे.

दरम्यान, मीडियाशी बोलताना श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanga) यांच्या पत्नी सुमन वनगा या नेमक्या काय म्हणाल्या ते बघा..

“माझे मिस्टर श्रीनिवास वनगा.. हे त्यांच्या पालघर विधानसभेत व्यवस्थित काम करत होते. फक्त ते प्रसिद्धी करत नव्हते. त्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की, त्यांना उमेदवारी मिळेल त्या पद्धतीने ते बांधणी करत होते. ते प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले. ज्यावेळेस ते माझ्या मुलाचा वाढदिवस होता 20 तारखेला तेव्हा ते तिकडे गेले आणि तेव्हा त्यांना सांगितलं.. त्यांना शब्द पण दिला होता की, तुम्हाला आम्ही परत घरी नाही बसवणार.. तुमच्यासाठी आम्ही आहोत. परंतु तो शब्द पाळला नाही.. आणि कालपासून ते जेवत पण नाही.. बोलत नाही.. वेड्यासारखं वागतात.. आत्महत्या करणार असंच बोलतात.. बोलतात माझं आयुष्य संपून गेलं.. ज्या माणसाने मला.. देवमाणूस होते उद्धव साहेब… त्यांचं सारखं (उद्धव ठाकरे) नाव घेतात माझे पती.. आणि सांगतात माझी चूक झाली की मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला. त्यांनी मला शब्द दिलेला… 39 आमदारांचं पुनर्वसन केलं.. पण माझ्या पतीचं काय चुकलं? दोन-तीन दिवस झाले जेवतच नाही.. फक्त मरायच्याच गोष्टी करत आहेत. आई सांगते, मी सांगते पण ऐकतच नाही.. त्यांना आधी तिकीट देणार नंतर सांगितलं की, डहाणू मतदारसंघातून देणार.. तरी आज देखील त्यांचं नाव आलं नाही. त्यामुळे ते फार दु:खी झाले आहेत. ते पूर्णपणे नैराश्यात गेलेले आहेत. त्यांचं काही बरं-वाईट झालं तर मी कोणाला जबाबदार ठरवू?” असं सुमन वनगा यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास वनगा यांची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: प्रयत्न केले असल्याची माहिती आता समोर येत आहे. मात्र, वनगांनी त्यांना प्रतिसाद दिला नसल्याचं कळतंय. तिकीट नाकारल्यापासून आतापर्यंत श्रीनिवास वनगा बेपत्ता आहे. त्यामुळे पोलीस आणि कुटुंबियांकडून त्यांचा शोध घेतला जातोय.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top