Term Insurance का घ्यावा ? Term Insurance vs Life Insurance यापैकी कोणता चांगला? सविस्तर मार्गदर्शन

Term Insurance vs Life Insurance

Term Insurance: “इन्शुरन्स” हा शब्द “इन्शुअर” या इंग्रजी शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ “खात्री देणे” असा होतो. जेव्हा आपण काहीतरी विमा घेतो, तेव्हा विमा कंपनी आपल्याला खात्री देते की, कराराप्रमाणे संबंधित गोष्टीचे काही नुकसान झाल्यास, त्याची जबाबदारी कंपनीची असेल. थोडक्यात काय तर आपण आपली मोठी जबाबदारी (आणि त्या जबाबदारी सोबत येणारा धोका/ risk) थोडे पैसे देऊन त्या कंपनीवर टाकत असतो.

उदाहरणार्थ, गाडीचा इन्शुरन्स घेतला असल्यास गाडीला काही झाले तर कराराप्रमाणे खर्च कंपनीचा असेल. तसंच, आरोग्य इन्शुरन्स घेतल्यास आपल्याला आजारपणात लागणारा खर्च कराराप्रमाणे कंपनीला करायचा असतो. अगदी याचप्रमाणे आपण टर्म इन्शुरन्स घेतलाय व काही कारणाने आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर नंतर कराराप्रमाणे ठरलेली रक्कम कुटुंबीयांना द्यायचे काम कंपनीचे असणार.

आता ह्यात गोष्टीत सर्वात महत्त्वाचा शब्द आहे “कराराप्रमाणे”! या करारात अनेक अटी व शर्ती असतात, कारण जगात जर सर्व लोक जर खरेपणाने वागले असते आणि विमा कंपनीला पण नफा कमवायचा नसता तर हा करार फार तर २ ओळीत संपला असता. पण तसे नसल्याने खोटेपणापासून बचाव आणि नफा जास्तीत जास्त व्हावा ह्या हेतूने कोणत्याही कंपनीचा करार हा खूप मोठा आणि किचकट असतो.

आणि ह्या कराराची सर्वात मोठी अट हीच की वर्षभरात विमा घेतलेल्या गोष्टीला/व्यक्तीस कोणतेही नुकसान झाले नाही तर विमा करताना द्यायची रक्कम कंपनीकडे जमा होईल..! आणि इथेच आपली फसायला सुरुवात होते. त्यासाठी खालील सर्व माहिती व्यवस्थित वाचा..

लोक Term Insurance का घेत नाहीत?

भारतात अनेक लोकांकडे त्यांच्या गाड्यांचा विमा असतो, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे १०% लोकांचाही टर्म इन्शुरन्स नाही..! लोक गाडीला नुकसान होऊ नये म्हणून विमा घेतात, परंतु स्वतःला काही झाल्यास कुटुंबाचे काय होईल हा विचार करत नाहीत. बरं , आता जर तुम्ही म्हणाल की आमची LIC आहे, तर हे लक्षात घ्या की LIC ही एक कंपनी आहे. ही कंपनी लाईफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स दोन्ही विकते, असे असूनही बहुतांश लोकांकडे LIC ची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे पण टर्म इन्शुरन्स पॉलिसी नाही..! आता तुम्ही म्हणाल की या दोन्ही मधला फरक काय? तर खाली वाचा..

Term Insurance vs Life Insurance

Pure Term Insurance – मार्केट मधे टाकलेला पैसा वाढायला काही वेळ द्यावा लागतो पण तो वेळ देण्या आधीच जर आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले ह्या धोक्यापासून सुरक्षा देण्यासाठी Pure Term insurance (PTi) घ्यावा लागतो. बरं, लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हा इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स(Li) म्हणजेच LIC किंवा तत्सम इन्शुरन्स पेक्षा फार वेगळा आहे.

  • प्रीमियम (२५-३० वयासाठी):
    • Li (Life Insurance): ₹५०,०००/वर्ष
    • PTi (Pure Term Insurance): ₹१०,०००/वर्ष
  • इन्शुरन्स कव्हर (आपल्याला काही झाल्यास कुटुंबाला मिळणारी रक्कम):
    • Li: ₹२ ते ₹५० लाख (वयानुसार वाढते)
    • PTi: ₹१ कोटी
  • परतावा (विमा गरज न लागल्यास):
    • Li: ठराविक रक्कम (६० वर्षांनंतर)
    • PTi: काहीच नाही

अनेक लोक परतावा न मिळण्याच्या भीतीमुळे टर्म इन्शुरन्स घेत नाहीत, पण खरं पाहता, टर्म इन्शुरन्समध्ये कमी प्रीमियम भरून आपण आपल्या कुटुंबाला भविष्यातील आर्थिक संकटांपासून वाचवू शकतो. आपल्याला काही झाले तर Li चे ५० हजार देऊनही मिळणाऱ्या काही लाखापेक्षा PTi चे १०हजार देऊन मिळणाऱ्या १ कोटी मध्ये आपले कुटुंब निदान पैशाची तरी चिंता न करता जगू शकते. म्हणून वर्षाचे १० हजार असे ३०-३५ वर्ष प्रीमियम भरून (३-३.५ लाखात) आपण आपल्या जीवनातील एक खूप मोठी अनिश्चितता कमी करू शकतो.

असे असूनही बहुतांश लोकांकडे LIC ची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे पण Term Insurance पॉलिसी नाही आणि असे असायचे कारण पुन्हा तेच..नफा..! पण ह्यावेळी एजंट चा.. LIC एजंटला लाईफ इन्शुरन्स काढल्याने जास्त कमिशन भेटत असल्याने फक्त त्याच प्रकारची पॉलिसी लोकांना सांगितली जाते, आणि तीच पॉलिसी आपल्याला पटते पण, कारण आपल्याला पटवून देण्यात येते की फक्त लाईफ इन्शुरन्सच योग्य !

ह्या मध्ये आपण कोठेही लाईफ इन्शुरन्स वाईट आहे असे म्हणत नाहीये पण Term Insurance नसताना लाईफ इन्शुरन्ससाठी पैसे देणे घोडचूक आहे. अजूनही तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे LIC एजंट योग्य आहेत तर त्यांना हा प्रश्न विचारा -आज जर मला काही झाले तर माझ्या घरच्यांना किती पैसे भेटणार ?

स्पष्ट सांगायचे झाले तर Term Insurance म्हणजे असा इन्शुरन्स ज्याने आपल्याला जीवाचे काही बरे वाईट झाल्यास एकरकमी पैसे मिळून आपल्या कुटुंबाची कमीत कमी २० वर्षाची सोय होते.

किती टर्म इन्शुरन्स घ्यावा?

आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० पट किंवा २५ लाख रुपये यापैकी जे जास्त असेल तेवढा Term Insurance घ्यावा. कर्ज किंवा इतर देणी असतील तर ती रक्कमही कव्हर करावी, जेणेकरून आपल्या अनुपस्थितीत कुटुंबाला कर्ज फेडण्याची चिंता राहणार नाही.

कोणी घ्यावा?

ज्या व्यक्तीच्या उत्पन्नावर कुटुंब अवलंबून आहे, त्या प्रत्येकाने टर्म इन्शुरन्स घ्यावा. म्हणजे जर आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तरी आपल्या जाण्यानंतर आपले कुटुंब आर्थिक अडचणीत सापडणार नाही. टर्म इन्शुरन्स मधून मिळणाऱ्या पैशात ते त्यांचे चांगल्याप्रकारे जीवन जगू शकतील.

पण म्हणून घरात सगळ्यांनीच Term Insurance घेणे गरजेचे नाही. ज्यांची उत्पन्नावर कुटुंबाची निर्भरता नाही, त्यांच्यासाठी Term Insurance घेणे आवश्यक नाही, उदाहरणार्थ लहान मुले, वृद्ध किंवा गृहिणी. अशा कुटुंबियांच्या नावावर ठराविक रक्कम आपण SIP वाटे शेअर मार्केट मध्ये गुंतवलेले जास्त फायद्याचे ठरते.

तसेच ज्या घरात एकापेक्षा जास्त कमावते लोक आहेत किंवा ज्या घरात एकटाच कमवता आहे पण तुम्ही नसताना तुमचा व्यवसाय घरातील दुसरी व्यक्ती समर्थपणे सांभाळू शकते अशा वेळेस विमा हा ऑप्शनल आहे. कारण अशा घरात एक व्यक्ती ही दुसऱ्याची इन्शुरन्स पॉलिसीच असतेच. मग त्यांनी विमा काढण्यापेक्षा थेट गुंतवणुकीचा मार्ग धरलेला उत्तम..!

कधी घ्यावा?

Term Insurance हा आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनातील जबाबदारी / रिस्क कमी करण्यासाठी असतो म्हणून जशी जबाबदारी वाढते तसा तसा इन्शुरन्स घेतलेला चांगला. साधारणपणे ३ टप्प्यात घ्यावा..

  • पैसे कमवणे सुरू करताच
  • लग्न झाल्यावर
  • मुलं झाल्यावर

जशी जबाबदारी वाढेल, तसे Term Insurance घ्यावा. यामुळे प्रीमियम कमी येईल आणि गरजेच्या वेळी विम्याचे फायदे मिळतील.

कोणाकडून घ्यावा?

Term Insurance कुठून घ्यावा ? ऑनलाईन का ऑफलाईन? सरकारी कंपनी का खाजगी? महाग का स्वस्त? यांचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असणार आहे तरी काही विचारात घ्यावा अशा गोष्टी खालीलप्रमाणे..

१. पहिला विमा/ टर्म इन्शुरन्स हा LIC च्या एजंट कडून घेतलेला चांगला.. का ? तर आपल्याला काही झालं तर हे एजंट सहसा आपल्या ओळखीचे असल्याने आपल्या कुटुंबाला पॉलिसी चे पैसे मिळवून द्यायला आणि सर्व प्रक्रियेला मदत करू शकतील. ही पहिली प्रक्रिया फार महत्त्वाची असते..ती झाल्यास पुढच्या Online विमा च्या प्रक्रियेला त्रास होत नाही..पण फक्त online विमा घेतला असेल तर नंतर ह्या गोष्टींना मदत करणारे लोक मिळणाऱ्या रकमेच्या १०-२०% हे कमीशन म्हणून घेतात..

2. LIC चे हे एजंट आपल्या वयाच्या जवळपासचे असलेले चांगले.. का ? तर त्यांचं वय जर आपल्यापेक्षा खूप जास्त असेल तर वर जी ही मदत सांगितली आहे ती मदत करण्यासाठी तेच तेव्हा उपलब्ध नसतील म्हणजेच त्यांनाच काही झाले तर..? तर आपण केलेले नियोजन वाया जायची शक्यता उद्भवते.

3. दुसरा विमा ऑनलाईन आणि तशा मोठ्या खाजगी कंपनीच्या (बँकांचे पाठबळ असलेल्या किंवा SBI,HDFC,ICICI अशा बँका) वेबसाईट वर जाऊन काढलेला चांगला. त्याही पेक्षा सोपा पर्याय म्हणजे त्या कंपनीच्या वेबसाईट वर जाऊन त्यांना आपल्याला कॉल करायला सांगायचं.. ते आपल्याला कॉल करतात, समजावून सांगतात. आपण त्यांचा कॉल रेकॉर्ड करू शकतो. आणि ते WhatsApp वर आणि घरपोच दरवर्षी पॉलिसी पण पाठवतात..!

४. ह्यात महत्वाचे म्हणजे फोन पे किंवा किंवा पॉलिसी बाजार इ. वेबसाईट ह्या डिजिटल एजंट आहेत. ह्यांच्या कडून पॉलिसी काढायचा फायदा काहीच नाहीये. उलट तुम्ही थेट विमा कंपनी कडून विमा घेत असाल तर त्यांचे कमिशन द्यायचे वाचत असल्याने थोडीफार घासाघीस करून आपला प्रीमियम कमी पण करून घेता येऊ शकतो..!

५. तिसरा विमा हा ऑनलाइन आणि बऱ्या खाजगी कंपनीचा घेतलेला चालू शकतो.. कारण तोपर्यंत आपण २ विमा आधी घेतल्याने रिस्क बऱ्यापैकी कमी झालेली असते.. आणि अशा कंपनीचे प्रीमियम पण LIC पेक्षा बरेच कमी असते.

६. आता बघा ह्यातील सेटलमेंट ratio म्हणजे किती लोकांनी विमाचे पैसे मागितले (claim) आणि त्यातील किती लोकांना मिळाले..

lic

पण फक्त हेच बघून चालत नाही.. कारण विमा कंपन्या (सरकारी आणि खाजगी दोन्हीही) हा ratio चांगला दिसावा म्हणून छोट्या किमतीचे विमा (जास्त संख्या) सहज मान्य करतात पण मोठ्या रकमेचे (कमी संख्या) विमा रक्कम मंजूर करण्यास त्रास देतात.. कारण एक मोठ्या रकमेचा विमा नाकारला तर जास्त पैसे वाचतात आणि त्याने त्यांचा रेकॉर्ड पण खराब दिसत नाही..! त्यामुळे एकच मोठ्या किमतीचा विमा काढण्यापेक्षा ३ वेगळे/टप्याने विमा काढल्याने तेवढ्याच सुरक्षेसाठी कमी पैसे भरावे लागतात.. तसेच नंतर क्लेम भेटायला त्रास होत नाही.

कोणता घ्यावा?

सध्या भारतात २५ विमा कंपन्या आहेत.. आणि त्या एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसी घेऊन येत असतात.. अशाने गोंधळ होतो.. म्हणून IRDA (भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण) ही संस्था जी सर्व विमा कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण ठेवते, तिने २ निर्णय घेतले आहेत.. ज्याने आपले ग्राहकाचे काम सोपे झालेय.. ते खालीलप्रमाणे..

१. ज्या व्यक्तीने नियमित प्रीमियम भरले आहे.. त्या व्यक्तीचा क्लेम (नंतर भेटणारी रक्कम) कोणतीही कंपनी नाकारू शकत नाही.

२. प्रत्येक कंपनीने ‘सरल जीवन विमा’ नावाची विमा पॉलिसी आणावी.. ज्याच्या सर्व अटी ह्या सर्व कंपन्यांसाठी सारख्या आणि IRDA म्हणजेच सरकारने निर्देशित केलेल्या असाव्या.

म्हणजे आपण ही ‘सरल जीवन विमा’ ही साधी आणि सोपी पॉलिसी निवडणे चांगले.. फक्त कोणत्या कंपनीकडून घ्यायची हे ठरवावे. ह्याचा तोटा किंवा त्रास हा आहे की पॉलिसी बहुतेक सगळ्या कंपन्यांची २५ लाखापर्यंतच आहे.. म्हणून ज्याला जास्त विमा लागतोय त्याने जास्त कंपनीकडून घ्यावे किंवा वापरावे.

अंतिम टिपा:

  • जितक्या लवकर Term Insurance घ्याल तितका प्रीमियम कमी येईल.
  • विमा कंपनीकडून कोणतीही आरोग्य विषयक माहिती लपवू नये. मद्य घेत असल्यास किंवा मागच्या ३ वर्षात कधीही धूम्रपान/तंबाखू इ केलेले असल्यास फॉर्म भरताना तसे लिहावे..कारण ह्या सगळ्या गोष्टी नंतर विमा रक्कम नाकारण्याचे कारणे बनतात.
  • तुम्हाला विमा घ्यायच्या आधी जर डॉ ला भेटायला किंवा चाचण्या करण्यास सांगितले तर ते सर्व online करू नये..प्रत्यक्ष डॉ जाऊन भेटून तपासण्या करणे कधीही चांगले.
  • विमा हा सामान्य माणूस समोर ठेवून केलेला असतो..तुम्ही जर स्वतःहून जीव धोक्यात आणणाऱ्या खेळ/गोष्टी ( sky diving , rock climbing , rafting इ) करताना काही झाले तर विमा कंपन्यांना तुमचा विमा नाकारायचा पूर्ण हक्क असतो.
  • भारत सरकारच्या वर्षाला ३३० ₹ भरून विमा मिळणारी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा (PMJJBY) आणि वर्षाला १२ ₹ भरून मिळणारी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा (PMSBY) ह्या योजनांचा देशाचा एक करदाता म्हणून लाभ घेणे ही हुषारीचे ठरते. ह्या सरकारी योजनांची माहिती आपण आपल्या आजूबाजूच्या अल्प उत्पन्न गटातील लोकांना करून दिल्यास/ त्यांना काढून दिल्यास त्यांनाही विमाचा लाभ भेटू शकतो..!

Disclaimer: मराठीजन च्या या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती ही “अजय” यांच्या @amhiraigadkar या X वरील पोस्ट वरून घेण्यात आलेली आहे. यामागे सर्व मराठी जनतेला आर्थिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे तसेच योग्य तेथे गुंतवणूक करता यावी असा आमचा उद्देश आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top