Akshay Shinde Encounter: आरोपी अक्षय शिंदे पोलिस चकमकीत ठार, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

Badlapur Case Akshay Shinde Encounter political reactions

Akshay Shinde Encounter: बदलापूरमधील शाळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आल्याची बातमी काही वृत्तमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे. या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया आल्या असून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ करण्यात आलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे आहे. याप्रकरणी आता इतर राजकीय नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रिया आल्या आहे.

सोमवारी अक्षय शिंदे च्या मृत्यूनंतर बदलापुरातील आंदोलकांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला, तर काहींनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आमची मागणी होती. फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही आंदोलनावेळी केली होती. त्यामुळे आरोपीला शिक्षा मिळाली अशी भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली.

एन्काऊंटरबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

‘अक्षय शिंदेने पोलिसांची बंदुक खेचून फायरिंग केली. या गोळीबारात एपीआय निलेश मोरे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर काही पोलिसही जखमी झाले आहेत. अक्षय शिंदेने फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ, बचावासाठी गोळीबार केला आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. आता पोलीस तपास सुरू आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका

‘लहान मुलीवर अन्याय झाला, माणुसकीला काळीमा फासण्याचं कृत्य केलं, त्यावेळी विरोधक आरोपीला फाशीची मागणी करत होते. आता तेच विरोधक त्याची बाजू घेण्याचा प्रयत्न करत असतील तर हे दुर्दैव आहे, निंदाजनक आहे. एक पोलीस जखमी आहे, त्याचं विरोधी पक्षाला देणंघेणं नाही. जे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात, जे सणावाराला रस्त्यावर पावसात, उन्हात, थंडीवाऱ्यात उभे राहतात, त्या पोलिसांवर विरोधी पक्षाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, आक्षेप घेणं हे दुर्दैवी आहे. पोलिसांनी त्यांच्या बचावासाठी ही कारवाई केली आहे. याचा तपास होईल, चौकशी होईल’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

‘अक्षय शिंदेच्या पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्या चौकशीसाठी वॉरंट घेऊन त्याला नेण्यात येत होतं. त्यावेळी त्याने आधी पोलिसांची बंदुक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याने आधी पोलिसांवर फायरिंग केली, हवेत फायरिंग केली. त्यावेळी संरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर गोळी चालवली आहे. यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी अद्याप त्याच्या मृत्यूची अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू झाला आहे’, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

शरद पवार यांनी काय म्हटलं आहे?

बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे. असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ”महाराष्ट्र पोलिसांची एक प्रतिमा होती. सक्षम आणि कार्यसक्षम यंत्रणा म्हणून पोलिसांची ओळख होती. पोलीस ठाण्यात माणूस मरतो मग त्याचा खून केला का? त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कायदा सुव्यवस्थेवर कुणाचे नियंत्रण राहिले नाही. गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

अक्षय शिंदे हिंस्र होता का? – सुषमा अंधारे

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, ”हैद्राबादच्या बलात्कार प्रकरणात 4 आरोपींचा अशाच प्रकारे एन्काऊंटर करण्यात आला होता. तसच अक्षय शिंदे प्रकरणात घडलं आहे. पोलिसांकडून स्वरक्षणासाठी बनाव केला. त्यांनी केलेला स्वरक्षणाचा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. अक्षय शिंदे हिंस्र होता का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं आहे?

महायुती सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळले आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात उशीर करण्यात आला. लोकांच्या प्रचंड दबावानंतर एफ आय आर दाखल करण्यात आली खरी पण आता आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची ही शासन पुरस्कृत थट्टा आहे. असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

संस्थाचालक भाजपाशी सबंधित, त्याच्यावर कारवाई झाली नाही – वडेट्टीवार

वडेट्टीवार म्हणाले, “याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात? बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपाशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी झाडून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे की आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!” असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top