Ranjana Deshmukh life story: नुकतंच 3 मार्च रोजी अभिनेत्री रंजना देशमुख हिचा 24 वा स्मृतिदिन झाला. एक काळ असा होता की अभिनेत्री रंजना ही प्रसिद्धीच्या शिखरावर होती. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले होते. पण अचानक तिचा अपघात झाल्याने रंजनाचे संपूर्ण आयुष्यच पालटून गेले. मराठी अभिनेत्रींमध्ये त्याकाळी top वर असणारी अभिनेत्री रंजना या अपघातामुळे चित्रपट क्षेत्रातून गायब झाली.
अभिनेत्री रंजना देशमुखने झुंज, लक्ष्मी , मुंबईचा फौजदार, गोंधळात गोंधळ, सुशीला, बिन कामाचा नवरा, अशा काही गाजलेल्या चित्रपटांत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. अगोदर अभिनेते रवींद्र महाजनी आणि नंतर अशोक सराफ यांच्यासोबत रंजनाची जोडी अत्यंत सुपरहिट ठरली होती. खूप कमी वयात रंजनाने अभिनयक्षेत्रात ही प्रसिद्धी मिळवली होती. असंही म्हटलं जातंय की तेव्हा रंजना आणि अशोक सराफ यांचे लग्न होणार होते, पण रंजनाचा अपघात झाल्याने ते लग्न होऊ शकले नाही.
अपघात होण्याआधी रंजनाची ‘पंढरीची वारी’ या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून निवड झाली होती. या साठी चित्रपटाचे पोस्टरही बनवण्यात आले होते, त्या पोस्टर मध्ये रंजना बालकलाकार बकुल कवठेकरला खांद्यावर घेऊन उभ्या असल्याचे दाखवण्यात आले होते. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांनी केले होते तर चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांची होती.
असं म्हणतात की रंजनाचा अपघात होण्याआधी या चित्रपटाचे 70 टक्के काम पूर्ण झाले होते. पण त्याच दरम्यान अभिनेत्री रंजना या ‘झुंजार’ या चित्रपटाच्या शुटींगसाठी बंगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. त्यावेळी रंजना केवळ 32 वर्षांच्या होत्या. अपघातानंतर रंजना यांच्यावर छोटी मोठी अशी 25 ऑपरेशन झाली होती. तरीही ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट रंजनानेच करायचा असा अट्टाहास निर्माता अण्णासाहेब घाटगे यांचा होता. दरवेळी त्या आता चालायला लागतील असा विश्वास अण्णासाहेबांना होता. मात्र दोन वर्षे झाली तरीही रंजना अंथरुणाला खिळुन राहिल्या. अखेरीस रंजना आता पुन्हा कधीच चालणार नाही हे कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
प्रचंड नुकसान झाल्याने अण्णांच्या सर्व नातेवाईकांनी त्यांना हा चित्रपट सोडून देण्याचा सल्ला दिला होता. अण्णासाहेबांनी हा चित्रपट बनवण्यासाठी होता नव्हता तेवढा जवळचा सर्व पैसा खर्च केला होता. त्यावेळी त्यांना हा चित्रपट बनवण्यासाठी 18 लाख रुपये खर्च आला होता. ‘पंढरीची वारी’ चित्रपटात अभिनेते अरुण सरनाईक यांचीही मुख्य भूमिका होती, मात्र एका अपघातात त्यांचेही निधन झाल्याने अगोदरच दोन वर्षे अशीच गेली होती. यांनतर रंजनाचा अपघात झाल्याने त्यांचे खूप मोठे नुकसान झाले.
पण तरीही विठुरायासाठी हा चित्रपट तर पूर्ण करायचाच असा ठाम निर्णय अण्णासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे पुढे त्यांनी दोन वर्षे रंजनाची बरे होण्याची वाट पाहिली, पण ती बरी न झाल्याने त्यांनी रंजनाची परवानगी घेऊन तिची भूमिका अभिनेत्री जयश्री गडकर यांना दिली. पुन्हा एकदा नव्याने ‘पंढरीची वारी’ चित्रपटाचे शुटींग करण्यात आले. आणि अनेक संकटांना तोंड दिल्यानंतर अखेर 28 डिसेंबर 1988 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
‘पंढरीची वारी’ चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली. ‘धरिला पंढरीचा चोर’ हे या चित्रपटातील गाणे सुपरहिट झाले. या चित्रपटात जयश्री गडकर, बाळ धुरी, राजा गोसावी, राघवेंद्र कडकोळ, दिनानाथ टाकळकर, सुरेश विचारे, आशा पाटील, नंदिनी जोग, बकुल कवठेकर, अशोक सराफ, अनुप जलोटा ई हे कलाकार झळकले होते.
या चित्रपटात विठुरायाच्या रूपातला ‘बकुल कवठेकर’ हा चिमुरडा बालकलाकार न बोलताही केवळ चेहऱ्यावरील हावभावावरून प्रेक्षकांना रडवून गेला. पण हा चित्रपट अजूनही ओळखला जातो ते रंजना मुळे. तिचा हा अर्धवट राहिलेला चित्रपट. हा चित्रपट रंजनाने केला असता तरीही तो नक्कीच सुपरहिट ठरला असता. पण दुर्दैव असं की अर्धे शुटींग झाले असतानाच रंजनाचा अपघात झाला. तिचे दोन्ही पाय आणि डावा हात निकामी झाले. रंजना केवळ 32 वर्ष वयाच्या असतांना त्यांना या भीषण अपघाताला सामोरे जावं लागलं. रंजनाने या अपघातानंतर आयुष्याची शेवटची 13 वर्षं ही व्हीलचेअरवर काढली. पुढे त्या खचत गेल्या आणि 2000 मध्ये परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या 45 व्या वर्षी त्यांचे हार्ट अॅटकने निधन झाले.
अभिनेत्री रंजना यांच्या विषयी एक आठवण दिवंगत जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘चौथा अंक’ या पुस्तकात सांगत म्हटलंय की “रंजना नेहमी इतरांना सांगायची की, गाडीत बसताना ड्रायव्हरच्या मागे कधीही बसू नये. कारण अपघात झाला तर ड्रायव्हर व त्याच्यामागे बसलेल्या माणसाला सगळ्यात जास्त धोका असतो. एकदा पहाटे ती तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघाली होती. अर्थातच रंजना ड्रायव्हरच्या मागे बसलेली नव्हती. अजून पूर्ण उजाडलेले नव्हते. वेगात असलेली गाडी अचानक एका झाडाला धडकली. या अपघातात कुणाला खरचटलंसुद्धा नाही. रंजनाचे मात्र दोन पाय या अपघातात गेले आणि तिचं चित्रपटातलं करिअर संपुष्टात आलं.” असं माधवी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ (Chautha Ank) या पुस्तकात लिहिले आहे.
‘चौथा अंक’
माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र
(ranjana deshmukh, pandharichi vari, ranjana ashok saraf, ranjana life story, ashok saraf, ravindra mahajani, )