Ravindra Mahajani: जेष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. यात माधवी यांनी रवींद्र महाजनी यांच्या विषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. यात त्यांनी सांगितल्या प्रमाणे रवींद्र महाजनी हे पत्नी माधवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत. याबद्दलचे अनेक प्रसंग माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे.
पण एकदा तर रवींद्र महाजनी यांनी पत्नी माधवीवर खूप धक्कादायक आरोप केला होता. याबद्दल माधवी यांनी म्हटलंय की “इतक्या विचित्र घटनांनी मी सुन्न होऊन जायची. काय करावं, मला सुचेनासं होई. मनात खूप विचार येत रहात. एक मात्र खरं, माणसाच्या दुःखाची नोंद कुणी फार घेत नाही. पण ज्यांचा दुरान्वेयही काही संबंध नाही, ते दोष द्यायला मात्र अगदी पुढे असतात. कधीकधी सगळं असह्य व्हायचं. मी एकटी असायची तेव्हा गच्चीवर जाऊन आक्रोश करायची. खूप भोगलं मी. या साऱ्या काळात रवीच्या घरचे, माझ्या घरचे, मित्रमैत्रिणी सगळे माझ्या बाजूनं होते. कारण त्यांनी आमचा संसार सुरुवातीपासून पाहिला होता. एकदा तर रवीनं कहरच केला. मला म्हणाला, ‘मी झाडाच्या मागे लपून पहात होतो. तू रस्त्यावरच्या पुरुषांना खाणाखुणा करून वरती बोलवत होतीस.’
त्या वेळी घरामधे सासूबाई, दोन मुलं, कामवाली, तो स्वतः सर्वजण रहात होते. असले आरोप ऐकून तर मी फार संतप्त आणि दुःखी होत असे. त्याबद्दल मी एकदा डॉक्टरांशी बोलले असता त्यांनी सांगितले की, ‘या प्रकारास हॅल्यूसिनेशन म्हणतात. खरोखरच अशा लोकांना तसे भास होतात.’ मी मैत्रिणींना पूर्वी मोठ्या अभिमानाने सांगत असे की, रवीचा माझ्यावर पुरेपूर विश्वास आहे. त्यानं मला प्रत्यक्ष एखाद्या पुरुषाबरोबर पाहिलं तरी त्याला ते खरं वाटणार नाही. तो म्हणेल माझ्याच डोळ्यांत काहीतरी बिघाड झाला म्हणून मला असे दिसतेय.
कधीकधी त्याच्या मित्रांना ड्रिंक घ्यायला जागा नसायची. रवी शूटिंगसाठी बाहेर गेलेला असे. अशा वेळी क्वचित कधीतरी त्यांनी मला असेदेखील विचारले आहे की, वहिनी आम्ही थोडा वेळ तुमच्या हॉलमधे बसतो. घरी सासूबाई, रश्मी असायचीच. ते यायचे आणि त्यांचे काम झाले की निघून जायचे. तेव्हाही कधी रवीला असे वाटले नाही की, मी घरात नसताना माझ्या मित्रांनी येता कामा नये. पण अलीकडे रवी माझ्यावर फारच संशय घेऊ लागला होता. अशाच एका प्रसंगी तो संतापला व मला हाताला धरून घराबाहेर काढू लागला. तेव्हा माझी मुलगी रश्मी त्याच्यावर एकदम ओरडली, ‘पपा, काय करताय हे? हे आईचं घर आहे. बाहेर नका काढू तिला.’ मग त्यानं माझा हात सोडला आणि गप्प झाला.” असा खुलासा माधवी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात केला आहे.

‘चौथा अंक’
माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र