Ravindra Mahajani: अभिनेते रवींद्र महाजनींनी पत्नीला गाडीतच बेदम मारलं, रात्री एकटीला सुनसान रस्त्यावर सोडून निघून गेले

ravindra mahajani wife madhavi 2

Ravindra Mahajani: मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात देखणे अभिनेते म्हणजे रवींद्र महाजनी हे होते. पण जुलै 2023 मध्ये त्याचं निधन झालं. आता त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यात त्यांनी केलेल्या खुलास्यानुसार अभिनेते रवींद्र महाजनी हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करत. अनेकवेळा तर ते त्यांच्या पत्नीला रात्री गाडीत बेदम मारहाण करून त्यांना एकटीलाच सुनसान रस्त्यावर सोडून निघून गेले होते. असा धक्कादायक खुलासा माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात पेज नंबर 71 ते 74 मध्ये केला आहे. (actor ravindra mahajani wife madhavi about her husband weird behaviour)

रवींद्र महाजनींनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरवात कधीपासून केली? तर याबद्दल माधवी यांनी सांगितलंय की “एकदा माझ्या एका जुन्या मैत्रिणीशी गप्पा मारत होते. मी वरच्या मजल्याच्या आमच्या बेडरुममधून बोलत होते. जुन्या आठवणी निघाल्या तेव्हा तिने जरा चेष्टेतच विचारले की ‘काय गं, अजून आठवतो का तो आपल्या शाळेतला मुलगा. त्यानं तुला प्रपोज केले होते. तुलापण तो बऱ्यापैकी आवडला होता.’ तेव्हा मी तिला हसून म्हटलं की, ‘हो, येते कधी कधी त्याची आठवण. जुन्या शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या की विषय निघतो.’ हे सारं मी फोनवरून सांगत असतानाच माझी मुलगी रश्मी खालून वरती आली आणि म्हणाली, ‘आई, तू काय बोलतेयस फोनवर ? बाबा अगदी कान लावून खालच्या फोनवरून ऐकतायत.’ ती असं म्हणाली तरी मला काही त्यात विशेष वाटलं नाही. शाळकरी वयातली ती गोष्ट. या निमित्ताने बोलले इतकंच.

मात्र नंतर माझ्या लक्षात आलं की, ती इतकीशी गोष्टसुद्धा रवीला सहन झाली नाही. तो स्वतःच्या देखणेपणावर अत्यंत खूश होता. अनेक स्त्रियांकडून त्याला त्याचं ॲप्रिसिएशन मिळत होतं. चक्क हीरोच होता तो!… आणि मी ? मी तर त्याच्या दृष्टीनं अगदीच सामान्य. त्याच्यावरून जीव ओवाळून टाकणारी, त्याचे सारे गुन्हे माफ करून त्याच्यावर फक्त प्रेम आणि प्रेमच करणारी! दुसरं कुणी मला आवडणं वगैरे… हे काय भलतंच ? कधीकाळी का होईना, पण कोण मुलगा हिच्या संपर्कात आला होता ? तेव्हापासून त्याचं बिनसल्याचं माझ्या लक्षात आलं. तसाही तो फार लवकर रागावत असे. पण त्यानंतर त्याने अंगावर हात टाकायला सुरुवात केली.

कधीकधी तर इतकं चिडायचा की स्वतःचेच केस उपटायचा. मला म्हणायचा, ‘तो कोण आहे? कुठं असतो ते सांग मला.’ आणि म्हणायचा, ‘त्याच्याशी तुझं लग्न करून देतो मी.’ पण मला कळलं होतं, कशात काही नसताना तो चांगलाच दुखावला होता. इतक्या क्षुल्लक गोष्टीला तो इतकं महत्त्व देईल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं. पण त्याचा इगो दुखावला होता एवढं खरं!” असा खुलासा माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

पण यानंतर माधवी यांनी त्यांचे पती अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दल खूपच धक्कादायक खुलासा केला आहे. यात पुढे माधवी म्हणाल्या की “त्याचा तोल कशावरून जाईल सांगता येत नसे. घडीघडी त्याचे मूड बदलत. खदखदून हसणारा रवी पुढच्या अर्ध्या तासानंतर माझ्या अंगावर धावून येई. एकदा आम्हाला माझ्या नणंदेकडे जायचे होते. आम्ही खाली डायनिंग रुममधे गेलो. साबुदाण्याची खिचडी खाल्ली. वरती येऊन तयार होण्यासाठी तो डोक्यातून शर्ट काढत होता. त्याला निघेना. मी पुढे झाले. बरीच झटापट करून तो शर्ट एकदाचा अंगातून निघाला. आम्ही दोघेही त्या वेळी हसत होतो. त्यानंतर काही काळ तो गप्प झाला. मग त्यानं अचानक माझे केस धरून जोरात ओढले. असह्य वेदना झाल्या. तो ओरडला, ‘काय घातलं होतंस खिचडीत? शर्ट का नव्हता काढता येत मला ? तुला काय वाटलं? म्हातारा नाही झालो मी…’ तो अशीच बडबड करीत असताना आम्ही निघालो.

गश्मीरच्या मुंजीचं आमंत्रण द्यायला मुंबईला निघालो होतो. खरं तर आनंदाचा प्रसंग पण त्याचा मूड आता गेलेला होता. समजूत काढण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला. आत्ताच तर आपण चांगल्या मूडमधे होतो. अचानक काय झालं तुला ? आपण दोघेही आत्ता हसत होतो असं आठवून दिलं. पण त्याचा संताप अनावर झाला होता. गाडी थांबवून मला तो गाडीतच मारू लागला. तो एवढा आडदांड . त्याच्यापुढे मी अगदीच बारकुळी. मी मार खात राहिले. त्यानंतर तो अत्यंत अर्वाच्य भाषेत शिव्या देऊ लागला. अखेरीस मला सारं असह्य होऊन मी म्हटलं, ‘मी उतरते इथे. गाडी थांबव.’ त्यानं ताबडतोब गाडी थांबवली. रात्रीचे साडेअकरा-बारा वाजले होते. त्याला क्षणभरही वाटलं नाही की, इतक्या रात्री ही एकटी कुठे जाईल ? कशी जाईल?

मी गाडीतून उतरताच तो गाडी पुढे घेऊन गेला. दुखऱ्या मनानं रस्त्यावर उतरल्यावर मी आजूबाजूला पाहिलं. रस्त्यावर नाव होतं, ‘ह. रा. महाजनी मार्ग’. कालगती पाहा. ह. रा. महाजनी माझे सासरे. अशा सुसंस्कृत, स्त्रियांच्या बाबतीत इतका सुधारणावादी असलेल्या विद्वान माणसाच्या मुलाने आपल्या बायकोला बेदम मारलं होत आणि अपरात्री तिला एकटीला सुनसान रस्त्यावर सोडून तो निघून गेला होता. हातात काही पैसे नाहीत. दुखलेल्या शरीरानं आणि दुखावलेल्या मनानं मी बांद्रयाच्या दिशेनं चालत राहिले. रात्री कधीतरी नणंदेकडे पोहचले. रवी त्यांच्याकडे अर्थातच पुष्कळ आधी पोहचला होता आणि गाढ झोपला होता. सासरचे सर्वजण मला समजून घेत होते. माझ्याशी नेहमी ते चांगलेच वागले. हे सारं अशा प्रकारे पहिल्यांदाच घडलं. तोपर्यंत त्यानं माझ्यावर कधीही हात टाकला नव्हता. कधी वाईट बोलला असंही नाही. पण ही त्याच्या पुढच्या वाईट वागण्याची सुरुवात होती असं आता वाटतं.

एकदा माझी नणंद, तिचे यजमान आणि आम्ही दोघं बाहेर जेवायला गेलो. गप्पा मारत छान जेवण झाले. आम्ही दोघे थोडे पुढे आणि मागून ते दोघे असे आम्ही तिथून निघालो. रवीला काय झालं कळलं नाही, तो अचानक रस्त्यातच मला मारू लागला. आमचं काही भांडण झालं नव्हतं, वाद नाही; त्यानं थेट मारहाण सुरू केल्यावर आम्ही गोंधळून गेलो. माझी नणंद आणि तिचे यजमान यांनी मधे पडून माझी त्याच्यापासून सुटका केली आणि आम्ही घरी आलो. येताना त्या दोघांना घरी सोडलं. पुढे आम्ही निघाल्यावर पुन्हा त्याची मारहाण चालू झाली. याही वेळी मी पुन्हा गाडीतून मधेच उतरले. त्यानंही गाडी थांबवली. तिथून रवीनं सुरू केलेलं बांधकाम ‘स्वरूप पार्क’ नावाचं कॉम्प्लेक्स होतं तिथं मी गेले. वॉचमन ओळखीचा होता. त्यानं मला एका फ्लॅटचं दार उघडून दिलं. बांधकाम अजून पूर्ण झालेलं नव्हतं. फक्त भिंती आणि दारंखिडक्या झालेली होती. वॉचमनने तिथली एक जुनी कॉट मला दिली. मी त्यावरच रात्र काढली. सकाळी उठून घरी गेले.” असा धक्कादायक खुलासा माधवी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात केला आहे.

chautha anka book
1Our Pick
‘चौथा अंक’

माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top