Ravindra Mahajani: दिवंगत जेष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाला आता काही महिने झाल्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यात त्यांनी अनेक चांगल्या वाईट आठवणी शेअर करत त्यांचे पती अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. (Actor Ravindra Mahajani became a taxi driver after not getting a job)
यात रवींद्र महाजनी सुरुवातीला प्रेमभंग झाल्याने व्यसनी आणि जुगारी झाले होते. तसेच ते नोकरीही करत नव्हते. माधवी यांनी सांगितल्या प्रमाणे शिक्षण पूर्ण न केल्यामुळे रवींद्र महाजनी यांना नोकरीच्या फारशा संधी मिळत नव्हत्या. मुळात त्यांना नोकरी करायचीच नव्हती. तर त्यांना अभिनेता बनायचे होते आणि यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरु होते. असं माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलंय.
याबद्दल माधवी यांनी त्यांच्या या पुस्तकात म्हटलंय की “रवी आणि मी आम्ही एकमेकांना भेटत होतो. गप्पा मारत होतो. रवीकडून काहीही लपवलं जात नव्हतं. रवीच्या वडिलांनी त्यांच्या ओळखीने एके ठिकाणी साऊन्ड रेकॉर्डिस्टची त्याला नोकरी लावून दिली होती. पण ती त्यानं काही दिवसांनी सोडून दिली. मी बीएच्या शेवटच्या वर्षाला होते. एकदा म्हणाला, ‘मी नोकरी कधी करणार नाही. संसार करणं, जबाबदाऱ्या घेणं हा माझा स्वभाव नाही. त्यामुळं खरं तर मी लग्न करणारच नाहीय.’ ‘पण मग तू काय करणार?’ मी विचारलं. ‘मी हीरो होणार.’ तो आत्मविश्वासानं म्हणाला. मग मला म्हणाला, ‘मी लग्न करणार नाहीचंय. पण केलं तर तुझ्याशीच करेन.’ हे ऐकून तर मी खूशच झाले.”
पण पुढे लग्नानंतरही रवींद्र महाजनी आणि माधवी हे दोघेही बेरोजगार होते. याविषयी माधवी यांनी म्हटलंय “लग्नानंतर ३-४ वर्षे आम्ही मुंबईत स्ट्रगल करीत होतो. रवीला काहीच काम मिळत नव्हतं. त्या वेळी रवीला कोणीतरी सांगितले की, तुला ते घर लाभत नाहीय. म्हणून माझ्या संमतीने तो बांद्राच्या मरीना नावाच्या लॉजमधे जाऊन राहिला होता. तिथे जास्त करून सिनेमात काम करणारे स्ट्रगलर रहात होते. मला भेटायला तो वानखेडे स्टेडिअमवर यायचा. पण शेजारीपाजारी, सर्वजणांना ‘नवराबायको वेगळे का राहतात?’ असा प्रश्न पडायचा. आणि त्यांना काय उत्तर द्यावे हे मला काही समजायचे नाही.
आमच्याकडे सासऱ्यांची कार होती आणि आईनंही मला एक कार भेट दिली होती. उत्पन्नाचा एक मार्ग म्हणून रवी म्हणाला, आपण आपली कार टॅक्सी म्हणून चालवायला देऊ. त्या काळी ड्रायव्हरने रोज मालकाला तीस रुपये द्यावेत व वरचे पैसे त्याचे; असा व्यवहार असायचा. सुरुवातीला रोज तीस रुपये ड्रायव्हरकडून मिळत असत. पण नंतर ते फसवू लागले. कधी म्हणायचे, पोलिसांनी अडवलं, कधी काही…. ड्रायव्हर आपल्याला फसवतोय हे लक्षात आल्यावर रवी चिडला आणि त्यानं ड्रायव्हर ठेवायचं बंद केलं.
पण मग यावर उपाय काय ? कारण टॅक्सी चालवण्यासाठी ठराविक बॅच जवळ असणं गरजेचं होतं. आरटीओकडून तो मिळणं आवश्यक होतं. प्रयत्न करूनही तसा बॅच काही त्यांच्याकडून मिळेना. मग रवी रात्रीच्या वेळची गिऱ्हाइकं घ्यायला लागला. पोलिस त्याला बरोबर अडवायचे. त्याच्याकडूनही पैसे काढायचे. रात्रीच्या वेळी मुख्य गिऱ्हाइकं म्हणजे अवेळी एअरपोर्टवरून घरी जाणारीयेणारी माणसं किंवा वेश्यांकडे गिऱ्हाइकांना नेणं-आणणं. रवीसारख्या देखण्या ड्रायव्हरवर तिथल्या बायका खुश असायच्या. त्याची गाडी दिसली की, ‘हीरो आया, हीरो आया’ म्हणत त्याला बघायला बायका जमा व्हायच्या.
रवीनं टॅक्सी चालवायला सुरुवात केली तेव्हा, लोक काय म्हणतील याची अर्थातच त्याला पर्वा नव्हती. मला मात्र वाटे, ह. रा. महाजनींचा मुलगा, माझा नवरा टॅक्सी चालवून पैसे मिळवतो; हे नातेवाईकांत कळले तर? त्याच्या दिसण्यावरून तो टॅक्सी ड्रायव्हर वाटायचा नाही. मग तो त्या वेळात कायम एक मळलेला शर्ट घालत असे. सुधीर दळवी हा त्या वेळचा गाजलेला नट. रवीचा मित्र. हा टॅक्सी चालवायला निघाला, तेव्हा तोही त्याच्याजवळ बसला. वाटेत गिऱ्हाईक घेतले. सुधीर आणि रवी ह्यांच्या सिनेजगताबद्दल अनेक गप्पा चालल्या होत्या. अखेरीस न राहवून टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने विचारले की, तुमच्यापैकी कोणी सिनेमात काम करते का? रवींद्र महाजनी हाच टॅक्सी ड्रायव्हर आहे हे कळल्यावर तो चकित झाला. लगेच दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी आली, ‘ह.रा. महाजर्नीचा मुलगा टॅक्सी ड्रायव्हर.’ त्यामुळे ही गोष्ट सर्वत्र झाली.

‘चौथा अंक’
माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र