Raj Thackeray vs Manoj Jarange Patil: सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांत वार-पलटवार सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनावर राज ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. ज्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनीही राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. (Raj Thackeray vs Manoj Jarange Patil on Maratha Reservation Protest)
मनोज जरांगेंची पुन्हा उपोषणाची घोषणा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा उपोषण आंदोलन केले आहे. यावेळी तर त्यांनी हजारो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला. पण मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन वाशीतच संपवण्यात यश आलं. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित एकमेकांना पेढे भरवत आणि गुलाल लावत त्यांनी विजयोत्सव साजरा केला.
पण आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. 10 फेब्रुवारी पासून ते उपोषण करणार आहेत. यावरच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे.
राज ठाकरे यांचे मनोज जरांगेंवर प्रश्न
नाशिक येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण याबाबत त्यांची रोखठोक भूमिका मांडली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की “नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि मराठा मोर्चेकरी विजयोत्सव साजरा करू लागले. पण विजय काय मिळाला, हे तर लोकांना कळले पाहीजे. जे सामान्य मराठा बांधव, भगिनी मुंबईत आले होते, त्यांना तरी काय निर्णय झाला, हे कळलं का? जर तेव्हा आनंद व्यक्त केला होता, तर आता परत उपोषणाची वेळ का आली?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
तसेच यापुढे राज ठाकरे असंही म्हणाले की “मी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली तेव्हा आंदोलकांसमोरच मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती, जरांगे पाटील यांची मागणी झटक्यात पूर्ण होणार नाही. हा तांत्रिक आणि कायद्याचा मुद्दा आहे. अशाप्रकारचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही आणि केंद्र सरकारला यावर निर्णय घ्यायचा असेल तर सर्व राज्यांचे मत जाणून घ्यावे लागेल. कारण प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावे लागेल. विशेष अधिवेशन बोलवावे लागेल.” असं राज ठाकरे म्हणाले.
यानंतर मनोज जरांगे पाटील फसले की फसवले गेले? असा प्रश्न पत्रकारांनी केला यावर राज ठाकरे म्हणाले की “मी एखादी गोष्ट बोलतो, ती सुरुवातीला कडवट वाटते. पण तिच गोष्ट सत्य असते. या आंदोलनाला आतून-बाहेरून कोणाचा पाठिंबा आहे ते सर्वांना माहिती आहे. केवळ ती गोष्ट उघड बोलता येत नाही. मराठा समाजातील बांधवांनी याचा विचार करावा.. मागे एकदा मराठा समाजाला तापवलं, ते सर्व मुंबईत मोठ्या संख्येने आले. आता दुसऱ्यांदा मुंबईत मोर्चा काढण्यात आला. पण वस्तूस्थिती आपण पाहणार आहोत की नाही? कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे म्हणून आपल्याला मोर्चासाठी नेले जात आहे, याचा विचार प्रत्येक समाजाने केला पाहीजे.” असंही राज ठाकरे म्हणाले आहे.
मनोज जरांगेंचा पलटवार
राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटलांवर अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. यात मनोज जरांगे म्हणाले की “हे सगळे राजकीय डाव आहेत. काही जण राजकीय सुपाऱ्या घेतल्यासारखे बोलतात. मुळात आरक्षण ठेवलेलं असतं का? कोणीतरी गेलं आणि लगेच मिळालं असं काही असतं का? हवं तर राज ठाकरे यांनी माझ्या जागी यावं, मराठ्यांचं नेतृत्व करावं. एका दिवसात आम्हाला आरक्षण मिळवून द्यावं. आम्ही तुमच्या मागे उभे राहतो. मुळात आरक्षणाची एक मोठी प्रक्रिया असते. तुम्हाला यात काही मिळालं नाही म्हणून तुमची पोटदुखी सुरू झाली आहे. राज ठाकरे म्हणतायत आरक्षण मिळालं नाही. त्यांचं खरं आहे त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यांना पैसे पाहिजे होते, पद पाहिजे होतं, ते मिळालं नाही. मी दुकानंच बंद केली आहेत काही लोकांची.” असं म्हणत जरांगे पाटलांनी राज ठाकरे आणि इतर राजकीय नेत्यांवर निशाना साधला आहे.
तसेच राज ठाकरेंवर सुपारी घेतल्याचा आरोप करत मनोज जरांगे म्हणाले की “राज ठाकरे सतत कोणाची तरी सुपारी घेऊन बोलतात. यावेळी ते सत्ताधाऱ्यांची किंवा इतर कोणाचीतरी सुपारी घेऊन बोलत आहेत. पण त्यांच्या बोलण्याने काही होणार नाही. आता सर्व मराठे एकवटले आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय मराठे मागे हटणार नाहीत. राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे नेमका कसला विजय मिळाला, त्याचा मराठा समाज अभ्यास करतोय. पण मुळात मला एक गोष्ट कळत नाही. राज ठाकरे कधीपासून असे मराठ्यांच्या विरोधात बोलू लागले? ते जाऊन आले का नाशिकला? कारण ते कधी असं बोलत नव्हते. मराठ्यांच्या बाजूने बोलत होते. त्यांच्याबद्दल आम्हाला अपेक्षा नाही. राज ठाकरे यांना मानणारा मराठ्यांमध्ये एक वर्ग आहे. पण त्यांच्यासारखे कायद्याचे अभ्यासक, राजकीय पटलावर भाषणं गाजवणारे नेते असं काहीतरी बोलतील असं मला वाटत नाही. आत्ता तुम्ही पत्रकार सांगत आहात यावर माझा विश्वास बसत नाहीये.” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे.
राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सध्या सुरु असलेल्या वार-पलटवारवर आता अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. यात काहींनी राज ठाकरे यांचे समर्थन केले आहे, तर काहींनी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन केले आहे.